नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात येणारा सर्व साठा व पुरवठा केवळ जिल्हाधिकारी किंवा अन्न व औषध निरीक्षक यांच्याकडून होईल, असे कडक निर्देश आहे. तथापि, अशा काळातही रेमडेसिवीर नगर शहर व जिल्ह्यातील व्हीव्हीआयपींना बाहेर उपलब्ध होते, हे अत्यंत आश्चर्यजनक आहे, अशी भावना (आयएमए) इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशने जनहितार्थ पत्रक काढले आहे. सध्या रेमडेसिवीर किंवा टोसिलिझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार वाढला आहे. एका रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारातील किंमत साधारण चाळीस हजार व टोसिलिझुमॅबची किंमत साधारण दीड लाख रुपयांच्या जवळपास असल्याच्या चर्चा आहेत. राज्य सरकारने रेमडेसिवीर वितरणाचे निर्बंध अत्यंत कडक केलेले आहेत. असे असताना हे इंजेक्शन बाहेर उपलब्ध होतेच कसे? असा सवाल ‘आयएमए’ने उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे ‘आयएमए’चे सभासद असलेले कोणतेही डॉक्टर करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन रेमडेसिवीर आणण्यासाठी सांगतच नाहीत. त्याच खूप धोका आहे. एकतर खर्या औषधाऐवजी बाहेर मिळणार्या त्या इंजेक्शनमध्ये दुसरेच काहीतरी (बहुतेकवेळा पाणी किंवा स्टॅरॉईड) मिसळलेले असते. अशी प्रकरणे समोर आल्याची उदाहरणे आहेत.
त्यामुळे त्या इंजेक्शनचा करोनाबाधित रुग्णांना फायदा होण्यापेक्षा त्यातून धोकाच होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांचे नातलग अशी औषधे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी किमान त्या इंजेक्शनचे पक्के बिल घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही ‘आयएमए’च्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
दरम्यान, ‘आयसीएमआर’ने दिलेल्या निष्कर्षानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन करोनाबाधित रुग्णांसाठी फारसे परिणामकारक देखील नाही, असेही ‘आयएमए’ने म्हटले आहे.