राधिका बिवलकर
अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन आणि बहुतेक सर्व अमेरिकन राज्यांनी फेसबुक विरोधात खटला दाखल केला आहे. या घटनेमुळे जगभरात जो संदेश गेला आहे त्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात दिसू शकतात.
अमेरिकेत आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला शांत करण्यात कुख्यात असलेली कंपनी म्हणून फेसबुकची ओळख आहे. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातील राज्यांची सरकारेही अस्वस्थ आहेत. कारण ही कंपनी प्रतिस्पर्ध्यांना काही वाव ठेवतच नाही.
या कंपनीची एक जुनीच पद्धत आहे की, बाजारात जो प्रतिस्पर्धी येईल ती कंपनी खरेदी करायची किंवा तिला पार संपवून टाकायचं. अमेरिकेच्या उद्योग जगतातील लहान मोठ्या स्पर्धकांना ही गोष्ट हळूहळू लक्षात आली आहे. आता फेसबुकवर जेव्हा न्यायालयीन खटले सुरू होतील तेव्हा फेसबुकला त्यांचे काही उद्योग गमवावे लागू शकतात. याशिवाय त्यांच्या साम्राज्यवादी मानसिकतेवरही नियंत्रण आणावे लागेल.
अफाट व्याप्ती असणाऱ्या मोठ्या कंपन्यांमुळे नव्या कंपन्यांच्या निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होताहेत. नावीन्याचा मार्गही बंद होतो आहे. उद्योगक्षम तरूणांना संपूर्ण स्थिरस्थावर होण्यापूर्वीच त्यांचे स्टार्टअप्स किंवा उद्योग मागेल त्या किमतीला विकत घेण्याची चुकीची परंपरा पुढे रेटली जाते आहे. जे तरूण नवी कंपनी स्थापन करून योग्य प्रकारे चालवू शकतात तेदेखील या संस्कृतीमुळे लाचार होतात.
आता प्रश्न असा विचारला जातो आहे की अमेरिकेत दुसरा झुकेरबर्ग जन्मालाच येणार नाही का? आर्थिक तज्ज्ञही हे मान्य करतात की एखादी कंपनी खूप मोठी होणे चुकीचे नाही; परंतु त्या कंपनीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याचे प्रयत्न शेवटी अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणारेच असते. अमेरिकेची अर्थव्यवस्था नावीन्यपूर्ण गोष्टींमुळेच ओळखली जाते. परंतु गेल्या काही दशकांमध्ये काही कंपन्या गरजेपेक्षा अधिक मजबूत होणे हे अमेरिकेच्या तंत्रज्ञानाला जड जाऊ शकते.
अमेरिकेच्या फेडरल व्यापार कमिशनने घेतलेल्या भूमिकेवरून फेसबुकला इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपसह इतर काही उद्योगांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. फेसबुक कंपनीला ह्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करणे शक्य झाले असते का. सतत वादग्रस्त राहणे आणि सतत मोठे होण्याचे प्रयत्न करणे फेसबुकला आता महागात पडण्याची शक्यता आहे. अमेरिका सरकार जेव्हा त्यावर लगाम लावेल तेव्हा जगभरातील कॉर्पोरेट संस्कृतीत बदल होतील.
पूर्वी काही कंपन्या समूहाने काम करत असत, सरकारी सवलती मिळवत असत. परंतु आता या शैलीत परिवर्तन झाले आहे. सध्या प्रत्येक देशामध्ये अशा काही कंपन्या उदयास आल्या आहेत ज्या आपापल्या क्षेत्रातील बाजारावर एकछत्री अंमल स्थापन करू इच्छितात. मात्र जगातील सर्वांनी मिळून प्रगती करणे यापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही.