नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात आलेल्या चित्ररथाचा समावेश न केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता. मात्र आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना एक पत्र पाठवत स्पष्टीकरण दिले आहे.
राजनाथ सिंह यांनी चित्ररथाचा परेडमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचे म्हटले आहे. या वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने बंगाल सरकारने नेताजींच्या आयुष्यावर आधारित चित्ररथ बनवला होता. मात्र केंद्र सरकारने सांगितले की या वर्षीच्या परेडमध्ये पश्चिम बंगालचा चित्ररथ सहभागी होणार नाही. त्यावरून ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहित या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.
या मागणीला आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपांना उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मी तुम्हाला विश्वासाने सांगत आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या चित्ररथांची निवड करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे. कला, संस्कृती, संगीत आणि नृत्य या विषयांमधले प्रख्यात विद्वानांच्या समितीकडून राज्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाचे मूल्यांकन होते. त्यानंतर ही निवड होते.