नागपूर – येत्या ४ मेपासून देशभरामध्ये दोन आठवड्यांसाठी लॉक डाउनचा तिसरा टप्पा लागू करण्यात येणार असल्याची घोषणा काल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे करण्यात आली. लॉक डाऊनचा तिसरा टप्पा देखील अन्य दोन टप्प्यांप्रमाणे देशव्यापी असला तरी या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे कालपासून परराज्यात अडकलेल्या कामगार, विद्यार्थी व यात्रेकरूंना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
कामगार, विद्यार्थी व यात्रेकरूंसाठी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात येत असल्या तरी या सर्वांचीच विशेष तपासणी करूनच त्यांना प्रवासाचा परवाना देण्यात येत आहे. अशातच नागपूरमध्ये आज आपापल्या राज्यात परतण्यास इच्छूक असणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सुरु करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेतर्फे ही तपासणी करण्यात येत असून या तपासणी नंतरच त्यांना पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल.
नागपूर महापालिका सध्या स्थलांतरित कामगारांची नोंदणी करून त्यांची आरोग्य तपासणी करत आहे.