मुंबई – राज्यात सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या वक्तव्यावरून राजकारण सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान देत राज्यात जर दंगलीच पेटव्याच्या असतील तर अगोदर स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे असे म्हटले होते.
दरम्यान, या आव्हानानंतर सुजात आंबेडकर यांची सक्रीय राजकारणात एन्ट्री झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या चर्चांवर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकरांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘सुजातने एमएससी केलं आहे. त्याला अजून शिकायचं आहे. शिक्षणासाठी तो बाहेर जातोय. तो आता पूर्णवेळ शिकायला जाणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत त्याने मांडलेल्या भूमिकेबाबत मी इतकंच सांगेन की, पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिलं. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्याने राजकारणात यायचं नाही हे मी त्याला सांगितलं आहे, असं ही प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.’