मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी मागणी बंडखोर आमदारांनी केली आहे. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर आज बंडखोर आमदारांच्या गटाकडून दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली.
दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. मात्र ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून कामं वेळेत झाली नाही. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची कामे झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेनेची अडचण झाल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान आमदारांच्या हॉटेलचा खर्च आणि जेट विमानाचा खर्च कोण करतय या संदर्भात केसरकर यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, आम्हाला वेतन भरपूर आहे. त्यामुळे असे प्रश्न विचारून काहीही साध्य होणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या बोलविण्यावर आम्ही आलो आहोत, असं म्हणत त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं.
यावेळी केसरकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत आपण शिवसैनिकच असल्याचं म्हटलं. तसेच आमच्या गटाच नाव आम्ही फक्त शिवसेना ठेवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.