गुवाहाटी – आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीरच असून त्या राज्यातील मृतांची संख्या 118 वर पोहोचली आहे. सिलचर शहर सलग सहाव्या दिवशी पाण्याखालीच आहे.
आसाम राज्य व्यवस्थापन आपत्ती प्राधिकरणाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, पुरामुळे 30 जिल्ह्यातील एकूण 45 लाख 34 हजार लोक प्रभावित झाले होते. पण त्यात काही प्रमाणात घट झाली असून आता 28 जिल्ह्यांमधील 33.03 लाख लोक पुराच्या प्रभावाखाली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती किरकोळ सुधारली आहे. धुबरी आणि नागावमधील कोपिली येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या खुणेवरून वाहत असतानाही नद्यांच्या प्रवाहात घट झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांना भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्न, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. परिस्थिती सुधारेपर्यंत ही मदत चालूच राहील, असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले. सिलचरमध्ये पूरस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तसेच बाधित लोकांना मदत सामग्री देण्यासाठी दोन ड्रोन देखील तैनात करण्यात आले आहेत.
सिलचर मध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफची आठ पथके आणि लष्कराचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. आसामातील बारपेटा, नागाव, कामरूप, धुबरी या जिल्ह्यातील स्थिती अजून सुधारलेली नाही. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 717 मदत छावण्या कार्यरत आहेत. एकूण 3510 गावांना या महापुराचा मोठा फटका बसला आहे.