मुंबई – राज्यातील करोनाबधितांच्या संख्येने धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
एका खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात टोपे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रीमंडळ घेईल.
देशात सर्वाधिक वेगाने लसीकरण महाराष्ट्रात सुरू आहे. आमच्या मोहिमेच्या वेगानुसार आम्हाला लसीचा पुरवठा करावा अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. आम्ही केंद्र सरकार करत असलेल्या मदतीबद्दल णी आहोत. मात्र, आणखी खूप काही करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह करोना आचारसंहितेची काटेकोर अंमल बजावणी सुरू आहे. यावेळची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंशिस्त पाळणे ही आहे. त्याचवेळी लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे. आम्ही करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी कटीबध्द आहोत. त्यासाठी ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटिंग या तीनटी कार्यक्रमावर आम्ही भर दिला आहे, असे ते म्हणाले.