नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून बहुतांश पक्षांतर्फे आपल्या उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहे. अशातच उमेदवार यादीतून नाव वगळण्यात आल्याने आम आदमी पक्षाच्या दोन नाराज विद्यमान आमदारांनी ‘आप’ला राम-राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे.
दरम्यान, दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जेष्ठ नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त करत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ”दिल्ली अभी दूर नहीं…’ असा संदेश दिला आहे. या संदेशामध्ये पाटील पुढे लिहतात, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक विचार आहे आणि या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहेत. हा वटवृक्ष आणखी बहरो! आमदार फतेह सिंह व कमांडो सुरिंदर सिंह यांचे पक्षात स्वागत!”