नवी दिल्ली – मोबाईल कंपन्यांना महसुलाच्या 100 रुपयातील 35 रुपये कर म्हणून द्यावा लागतो. हा कर कमी करण्याची गरज भारती एरटेल कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी व्यक्त केली आहे. एअरटेल कंपनीने 21 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा संकल्प केला आहे.
यानंतर पत्रकारांशी बोलताना मित्तल म्हणाले की आधुनिक जगामध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे. मात्र भारतातील मोबाईल कंपन्यावर प्रचंड कर्ज आहे. त्यामुळे या कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली अडकल्या आहेत.
लवकरच येणाऱ्या भांडवलाचा उपयोग आधुनिक तंत्रज्ञानात केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्याचा संकल्प केला आहे. मात्र जोपर्यंत या कंपन्यांचे नफे आणि महसूल वाढत नाही तोपर्यंत या कंपन्या मजबूत होणार नाहीत. ग्राहकाकडून मिळणारा महसूलही वाढण्याची गरज आहे. दरडोई महसूल 300 रुपयांपर्यंत गेला तरच मोबाइल कंपन्यांना त्यांचे कामकाज परवडेल असे त्यांनी सांगितले.