कोल्हापूर – २००५ पासून ते २०२१ पर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला चार मोठ्या महापुरांचा फटका बसला असून यापुढे महापुराचा धोका टाळणासाठी केंद्रीय जल आयोग व केंद्र सरकारकडून तातडीचे उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी केंद्रीय जल आयोगाकडे केली आहे.
या मागणीमध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी केंद्रीय जल आयोगाकडून तातडीने आंबोलीपासून ते महाबळेश्वर पर्यंत किमान १०० टी. एम. सी पाणीसाठा होणारे नवीन धरणांची ठिकाणे शोधून पाण्याचा विसर्ग कमी होण्याच्या दृष्टीकोनातून ऊपाययोजना केल्या पाहिजेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोरे लवादाच्या निवाड्यानुसार नवीन धरणे बांधण्यासाठी परवानगी नसल्याने महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश या तीन राज्यातील विभागाची एकत्रित बैठक घेऊन आंबोली ते महाबळेश्वर या भागात किमान १०० टी. एम.सी पाणीसाठा होईल एवढ्या धरणांची निर्मीती करून या धरणातील पाणी तीनही राज्यांना समान वाटप करावे.
यासाठी केंद्रीय जल आयोगाने या धरणांचा होणारा खर्च , पुनर्वसन यासाठी लागणारा निधी तीनही राज्याकडून व केंद्रसरकारकडून उपल्बध करून हे प्रकल्प पुर्ण करावे जेणेकरुन तीनही राज्यांना पुर नियंत्रणासाठी या धरणांचा उपयोग होईल.
सध्या वैश्विक तापमान वाढीमुळे हवामानात मोठे बदल झाले असून एका दिवसात ७०० ते ८०० मिलीमीटर अचानक पडणा-या पावसामुळे एवढ्या पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता या नद्यामध्ये नसल्याने महापुराची परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. सदर प्रकल्प पुर्ण झालेनंतर धरणामध्ये असणारा पाणीसाठा पावसाळ्याआधी नियंत्रित केल्यास व पावसाळ्यात ही धरणे भरून घेतल्यास पाण्याचा विसर्ग कमी करून महापुरावरती नियंत्रण आणता येणे शक्य होणार असल्याने केंद्रीय जल आयोग व केंद्र सरकारने याबाबत तातडीने ऊपाययोजना करण्याची मागणी केली आहे.