सातारा पालिकेपुढे आव्हान; उद्दिष्टपूर्ती होण्याबाबत साशंकता
सातारा (प्रतिनिधी) – आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ 18 दिवस उरले असताना 42 कोटी रुपये वसुलीचा आकडा गाठण्यासाठी पालिकेला जंग जंग पछाडावे लागत आहे. घरपट्टी वसुलीसाठी पथकांची संख्या कमी असल्याने उद्दिष्ट्यपूर्तीची अडचण होत असल्याची तक्रार आहे. सद्यस्थितीत तरी उद्दिष्टपूर्तीचे आव्हान पालिकेला पेलणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
पालिकेने करवसुलीचे अजून निम्मे उद्दिष्ट्य गाठले आहे. फक्त वसुलीचे व्याज वसूल होत आहे. मात्र, मूळ थकबाकी तशीच राहत आहे. सव्वा लाख लोकसंख्येला केवळ दहाच वसुली कर्मचारी असल्याने पालिका अजूनही मूळ उद्दिष्टापासून दूर आहे. रोजची सरासरी वसुली साठ टक्के असली तरी एकूण उद्दिष्टांच्या तुलनेत तीस टक्क्यांच्या वर सरकलेली नाही. मालमत्ता व पाणीकराचे मिळून 42 कोटी रुपये पालिकेला वसूल करावयाचे आहेत. यापैकी केवळ 15 कोटी 54 लाख 19 हजार रुपये वसूल झाले आहेत. उरलेल्या दिवसांत प्रशासन थकबाकीचे उद्दिष्ट कसे गाठणार, हा सध्या कळीचा मुद्दा आहे. राज्य संवर्गाचे उपमुख्याधिकारी हे वसुली प्रमुख असतात.
मात्र, सातारा पालिकेत ताज्या दमाचे उपमुख्याधिकारी आरोग्य विभागासाठी नेमले गेले आहेत. वसुलीची कमान सध्या अरविंद दामले यांच्याकडे आहे. वसुलीशिवाय त्यांच्याकडे आस्थापना विभागाची जवाबदारी असल्याने दामले यांची प्रचंड ओढाताण होत आहे.
पालिकेच्या हद्दीत तब्बल 35 हजार 300 मिळकती आहेत. निवासी मिळकतींची पाच रुपये तर व्यावसायिक मिळकतींची दहा रुपये चौरस फूटाप्रमाणे करआकारणी केली जाते. पालिकेच्या वसुली विभागाने करवसुलीसाठी पाच पथके आणि एक वाहन यांचे स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. शिवाय आजवर 140 थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून आणखी 100 थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. हातात नोटीस पडल्याने काही थकबाकीदारांनी स्वत: पालिकेत येऊन कराचा भरणा केला.
पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीचे 13 कोटी 40 लाख 29 हजार 511 तर पाणीकराचे एक कोटी 83 लाख 89 हजार 826 रुपये जमा झाले आहेत. एकूण थकबाकी तब्बल 42 कोटी रुपये असून यापैकी केवळ 15 कोटी 54 लाख 19 हजार 337 रुपये आजवर वसूल झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ 18 दिवस उरले आहेत. इतक्या कमी कालावधीत पालिकेला अजून 26 कोटी 45 लाख 80 हजार रुपये वसूल करावे लागणार आहे. 15 मार्चपासून प्रत्यक्ष वसुली आणि जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय वसुली विभागाने घेतला आहे.
कारवाईत अभाव धडाडीचा!
पालिकेच्या तिजोरीत दररोज 11 ते 13 लाखांचा कर जमा होत आहे. दिवसाला कमीत कमी 24 लाख रुपये महसूल येणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही हा आकडा पालिकेला गाठता आलेला नाही. सातारा पालिकेच्या मालकीच्या मंगल कार्यालयाची थकबाकी तब्बल साडेपाच लाख रुपये असताना ते सील करण्याचे धाडस पालिकेने दाखवले नाही. 26 कोटींच्या थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला दिवसाला जवळपास एक कोटी 45 लाख रुपये वसूल करावे लागतील. मात्र, हे अशक्यप्राय आहे. पालिकेला शिक्षण मंडळाचे 52 लाख व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे साडेतीन कोटी असा चार कोटीचा महसूल येणे बाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाला ठोस कारवाईची गरज आहे.