मेढा (प्रतिनिधी)- राजकारणापलीकडचा सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे वेगळं दर्शन बुधवारी झाले. प्रसंगांवधान दाखवून त्यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले.
मेढा येथे महायुतीचा महामेळावा बुधवारी होता. हा कार्यक्रम उरकून घरी परत जात असताना करंजे गावच्या हद्दीत एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध पडलेली दिसली. शेजारी मोटारसायकल होती. रांजणे यांनी गाडी थांबवली, उतरून पाहिलं तर चोरांबे गावचे पंचायत समिती अधिकारी रवींद्र सपकाळ होते, गर्दीतून कोणी रुग्णवाहिकेला फोन करत होते.
कोणीतरी रांजणे यांना सांगितले, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचे ते भाऊ आहेत. रांजणे यांनी लगेच रुग्णवाहिकेची वाट न पाहता आपल्या गाडीतून सपकाळ यांना दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. समवेत असणारे बापू शेलार, सुभाष शेलार, समीर शेलार आणि साई रांजणे व इतर युवकांनी यांनी रवी यांना त्यांच्या गाडीत ठेवले. गाडी थेट सातारच्या यशवंत हॉस्पिटलकडे नेली. दरम्यानच्या काळात डॉक्टरांना फोन करुन तिथली तयारी करुन ठेवायला सांगितली. जखमी रवी यांच्या घरी सांगण्यास निरोप दिले. सदाशिव सपकाळ यांना फोन लागला.
जे आवश्यक असेल ते करुन घ्या, आमचे लोक पोचतीलच, असे सदाशिव सपकाल यांनी त्यांना सांगितले. रांजणे यांनी वेगाने गाडी चालवत करंजे ते यशवंत हॉस्पिटलचा प्रवास ११ मिनिटांत केला. आवश्यक असेल ते करा असे रांजणे यांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला सांगितले. उपचार सुरु झाले. थोड्या वेळात सदाशिव सपकाळ यांचे चिरंजीव आणि त्यांचे कुटुंबीय तेथे पोहचले.
अर्ध्या तासापूर्वी झालेल्या सभेत रांजणे आणि बाकीच्या नेत्यांनी आपआपल्या भाषणात सदाशिव सपकाल यांच्यावर सडकून केली होती. आणि अर्ध्या तासानंतर सदाशिव सपकाळ यांचा भाऊ अडचणीत आहे म्हटल्यावर क्षणाचाही विचार न करता सगळी पळापळ होते, राजकारणात माणसं नुसती मोठी असून उपयोग नाही, ती मनाने पण मोठी असावी लागतात. ज्ञानदेव रांजणे यांनी हा वेगळाच अनुभव लोकांना दिला.