Passenger Vehicle sales January| – करोना संपुष्टात आल्यानंतर भारतातील वाहन विक्री वेगाने वाढत आहे. त्यातल्या त्यात स्पोर्ट युटीलिटी व्हेईकल म्हणजे एसयुव्ही वाहनांची विक्री जास्त होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये लग्नसराईमुळे अशा प्रकारच्या वाहनांची विक्री वाढून जानेवारीत प्रवासी वाहन विक्री विक्रमी पातळीवर गेली असल्याची माहिती वितरकांच्या संघटनेने जारी केले आहे.
डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया संघटनेने यासंदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, जानेवारी महिन्यामध्ये 3,93,250 प्रवासी वाहने विकली गेली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात विकल्या गेलेल्या 3,47,086 वाहनांच्या तुलनेत ही संख्या 13 टक्क्यांनी जास्त आहे.
आता वाहन कंपन्यांना कसल्याही सुट्या भागाची टंचाई भासत नाही. त्याचबरोबर व्याजदर जास्त असूनही आणि इंधनाचे जास्त असूनही भारतातील ग्राहकाकडून वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे वाहन कंपन्या दर महिन्याला नव नवी मॉडेल उपलब्ध करीत आहेत.
जानेवारी महिन्यात दुचाकी वाहनांची विक्री 15 टक्क्यानी वाढून 14,58, 849 इतकी झाली आहे.
यामध्ये 15% ची वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. खेड्यात क्रयशक्ती वाढली आहे. काही भागात पाऊस कमी पडल्यामुळे क्रयशक्ती कमी आहे तर काही भागांमध्ये जास्त आहे. मात्र एकूण मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यावसाईक वाहनाची विक्री वाढवून 89,208 इतकी झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 37 टक्क्यांनी वाढून 97,675 इतकी झाली आहे. ट्रॅक्टरची विक्री 21 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी महिन्यात एकूण वाहन विक्री 15 टक्क्यांनी वाढून 21,27,653 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 18,49,691 इतकी होती.
वितरकांच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब म्हणजे अजूनही प्रवासी वाहनांची इन्व्हेंटरी म्हणजे वितराकाकडे पडून असलेला साठा 50 ते 55 दिवसाचा आहे. त्यामुळे वितरकांचे नुकसान होत आहे. यासाठी वितरकांना जास्त व्याजदर मोजून भांडवल उपलब्ध करावे लागते.
त्यामुळे ही इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही वाहन कंपन्यांबरोबर चर्चा करीत आहोत असे या संघटनेचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले. जास्त काळ वाहने पडून राहणार नाही यासाठी उत्पादन क्षमतेचा योग्य वापर करण्याकडे वाहन कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.