मुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शुक्रवारी कोरोनाच्या 2682 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 35 हजार 967 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11 दिवस होता तो आता 15.7 दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.38 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे.