मुंबई : राज्यात सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. कारण “सेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले आज भाजपाच्या स्क्रिप्टवर काम करत असून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या खदखद सुरू आहे. तर त्यातील अर्धे अधिक आमदार आताच परेशान झाले आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत नव्हे तर त्या अगोदरच शिवसेना सत्तेवर येईल. त्यामुळे शिवसेना फार काळ विरोधात बसणार नाही”, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणाले, मला पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले असले तरी अद्याप आपण त्या खुर्चीवर बसलेलो नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फार काळ खुर्चीवर बसायचे नाही, असा मंत्र दिल्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगून दानवे यांनी भाजपावर टीका केली. पक्ष सोडण्यासाठी विविध कारणे बंडखोरांकडून दिली जात आहेत. तरी ज्यावेळी ते सेनेत मंत्रीपदावर होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सारे धंदे बंद केले होते. ते धंदे बंद झाल्यानेच ही मंडळी नाराज होती. आता सत्तेत गेल्यामुळे त्यांचे धंदे पुन्हा सुरू झाल्याचा आरोप दानवे यांनी केला.
ते पुढे म्हणाले आगामी काळ पक्षांसाठी संघर्षाचा असून क्रांति करण्याचा आहे. ती क्रांती करण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. पक्षातून बाहेर पडलेले गद्दार आगामी निवडणुकीत निवडून येणार नाहीत असा दावा केला. ते पुढे म्हणाले सत्तासंघर्षात न्यायालयाच्या निर्णय शिवसेनेचे बाजूनेच लागणार असून पाच खटल्यांपैकी एका खटल्याचा निकाल जरी आपल्या बाजूने लागला तरी राज्यात वेगळे चित्र दिसेल असा आशावादही अंबादास दानवे यांनी बोलून दाखवला.