-35 बंडोबांची आखाड्यातून माघार
-आठ मतदारसंघात
-73 उमेदवार रिंगणात
सातारा – विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील आठ मतदारसंघाचे अंतिम चित्र आज स्पष्ट झाले. कराड दक्षिण, कराड उत्तर, माण या मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीतील पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काही बंडखोर उमेदवारांनी उपसलेल्या तलवारी सोमवारी म्यान झाल्या.
आठ विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल केलेल्या एकूण 108 उमेदवारांपैकी 35 उमेदवारांनी माघार घेतल्याने आठ मतदारसंघांत आता 73 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतून पुरूषोत्तम जाधव यांनी माघार घेतल्याने रिंगणात सहा उमेदवार उरले असून भाजपचे उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील यांच्यातील सामना रंगणार आहे.
निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. निवडणूक कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत घेतला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. एस. शिंदे व निवडणूक उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची आकडेवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे यांनी जाहीर केली. त्यानुसार कराड दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक तेरा, फलटण व माण विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी अकरा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.
त्याखालोखाल वाई मतदारसंघातून दहा, पाटण विधानसभा मतदारसंघातून नऊ उमेदवारांनी, कोरेगाव मतदारसंघातून सात उमेदवारांनी तर कराड उत्तर व सातारा मतदारसंघातील प्रत्येकी सहा अशा एकूण 35 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले. शनिवारपर्यंत जिल्हाच्या आठ विधानसभा मतदारसंघातून 108 अर्ज दाखल झाले होते. मात्र, 35 जणांच्या माघारीमुळे 73 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. लोकसभा व विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी तब्बल पंधरा तास चालणार असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.
माण व फलटण या दोन विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी त्या त्या विधानसभा कार्यक्षेत्रात तर इतर सहा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अतिरिक्त एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून गुलाबी पट्टीचे ईव्हीएम मशीन लोकसभेसाठी व पांढऱ्या पट्टीचे मशीन विधानसभा निवडणुकीचे असणार आहे.
मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच व्होटर स्लिप दिल्या जाणार आहेत. स्लिपा मिळणार नाहीत त्यांनी 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावयाचा आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून मतमोजणीच्या एकूण जास्तीत जास्त 33 फेऱ्या तर कमीत कमी 30 फेऱ्या असतील.
“एमसीएनसी’ कमिटीच्या परवानगीशिवाय कोणत्याही उमेदवाराला सोशल मिडियावर प्रचार करता येणार नाही. सामाजिक तणाव वाढवणाऱ्या पोस्ट अथवा सांप्रदायिक आधारावर मतदानाची मागणी करता येणार नसल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. मतदारसंघात 36 भरारी पथके असून 28 छायाचित्रण पथके आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पुरूषोत्तम जाधव यांची वाई मतदारंसघांतूनही माघार
वाई विधानसभा व सातारा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज काढून घेत महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा केला. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले व वाई विधानसभा मतदारसंघात मदन भोसले यांच्यासाठी जाधव यांची माघार सेफ गेम ठरण्याची शक्यता आहे.
मतविभागणीचा फटका महायुतीच्या उमेदवारांना नको, याकरिता पक्षश्रेष्ठींच्या विनंतीला मान देऊन पुरूषोत्तम जाधव यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. दिवसभराच्या राजकीय घडामोडीत जाधव यांची माघार हीच घटना केंद्रबिंदू होती. साताऱ्यातही अपक्ष सागर भिसे यांनी आपला अर्ज माघारी घेतला.