पूर्वीच्या काळात मुद्रित माध्यमे नव्हती. त्या काळात मौखिक परंपरेने साहित्याचे आदानप्रदान होत असे. या काळात मक्ता प्रचलित होता. आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, ओवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून रचनाकार आपले नाव त्यात गुंफत असत त्यालाच उर्दूमध्ये मक्ता असे म्हणतात.
ग़ालिब किसे सुनाते गली मे तिरी गज़ल
उसके मकॉं का कोई दरिचा खुला न था
या शेरामध्ये ग़ालिब हे मिर्ज़ा असदुल्ला खॉं बेग या कवीचे टोपणनाव येते. त्याला मक्ता म्हणतात.
नामा म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी उभा । तू प्रसंगा
तुका म्हणे तुज । सोडविला कोणी एक चक्रपाणी । वाचुनिया
ज्ञानदेव म्हणे । व्यासाचिये खुणा द्वारकेचा राणा । पांडवाघरी
एका जनार्दनी । भोग प्रारब्धाचा हरीकृपे त्याचा । नाश होय
नंतर मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला आस्तेआस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरुवात झाली. त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरवात झाली. या नावालाच टोपणनाव असे म्हणतात. हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत.
-
अगदी सुरवातीच्या काळात नावात कमीतकमी शब्द असावेत या हेतूने टोपणनाव धारण केले असावे. तुका, जनी, नामा, ज्ञानू इत्यादी
-
नंतर आपल्या धर्माचे/ज्ञातीचे/समूहाचे/ नाव कळू नये यासाठी रचनाकारांनी अशा टोपणनावांचा आधार घेतला असावा.
-
स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना गुलामगिरीविरुद्ध चेतवण्यासाठी देशप्रेमाने भारलेले काव्य साकारू लागले. असे काव्य वाचून-ऐकून-गाऊन किंवा स्वातंत्र्याचा अट्टाहास धरणारे लेख, कथा, वर्तमानपत्रातील सदरे वाचून तरुण स्वातंत्र्याबाबत जागृत होऊ लागले. तेव्हा असे कवी-लेखक इंग्रजांना राजद्रोही वाटू लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खटले भरले गेले. या गुन्ह्याच्या व खटल्यांच्या कटकटीतून स्वतःला सुरक्षत राहून स्वातंत्र्याचे कार्य निर्धोकपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी टोपणनावाचा आधार घेतला गेला. याची असंख्य उदाहरणे देता येतील.
-
आपले लेखन हे एखाद्याच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने घडत आहे. किंबहुना आपले जीवन घडण्यासाठी आपल्या गुरूंचे खूप योगदान आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या टोपणनावात अशा आदरणीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला गेला. आठवुणी हैदर गुरुजींला, एका जनार्दनी, बाप रखुमाईवरा
-
काही व्यक्तींनी आपले भवितव्य व जीवन घडण्यासाठी अनमोल सहकार्य केलेले असते. याची जाणीव म्हणून त्या व्यक्तींच्या नावाशी आपले नाव किंवा नाते जोडून टोपणनाव धारण केले जाते. वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज, कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत, राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज
-
काही व्यक्ती लाजाळू असतात. त्यांना आपल्या रचना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतात, पण आपल्या मूळ नावाची गुप्तता ठेवून. अशावेळी त्या व्यक्ती मूळ नावाशी दुरान्वयेही संबंध नसणारे टोपणनाव घेतात. विशेषत: प्रेमप्रकरणात आपण पकडले गेलो, तर “तो मी नव्हेच’ असे म्हणायला टोपणनावे उपयोगी पडत असत.
-
काही रचनाकार भित्रे/घाबरट असतात. रचना उत्तम असतानाही त्यांना आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वतःचे नाव लावायचे धाडस होत नाही. टोपणनावाचा आधार घेऊन ते त्या रचना प्रसिद्ध करतात व तटस्थपणे प्रतिक्रिया अजमावत बसतात.
-
कधीकधी सहज वेगळेपण म्हणूनही टोपणनाव स्वीकारले जाते. अनेक लेखनप्रकारात लिहिणारे नामांकित लेखकही प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे टोपणनाव निवडतात. याची उदाहरणे वर दिली आहेत. काही लेखकांनी साहित्यप्रकार बदलले तरी आपले टोपणनावच सर्वत्र वापरल्याचे दिसते ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे हे त्यापैकीच एक. सानिया अर्थात सुनंदा कुलकर्णी बलरामनही अशाच.
-
वृत्तपत्रीय लेखन अथवा सदर लेखन करताना काही संपादक संकुचित वृत्तीने ठराविक ज्ञातीच्या रचनाकारांचेच साहित्य प्रसिद्धीसाठी निवडत असत. त्यांना वळवण्यासाठी, त्यांच्या आवडीच्या नावाशी साधर्म्य असणारे टोपणनाव निवडल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. तसेच एखाद्या वृत्तपत्राचा संपादक/उपसंपादक अथवा बातमीदार आपल्या मूळ नावाचा सातत्याने होणारा वापर टाळण्यासाठी टोपणनावाचा आधार घेतात. “बिझी बी’ या नावाने बेहराम कॉन्ट्रॅक्टर लिहित असे. किंवा जयवंत दळवी ठणठणपाळ नावाने लिहित असत. “ब्रिटीश नंदी’ प्रविण टोकेकर, “कलंदर’ अशोक जैन इत्यादी. “तंबी दुराई’ अर्थात श्रीकांत बोजेवार
-
विनोदी/चावट/अश्लील/पाचकळ लेखन करणारे बहुतांश लेखक सर्रास टोपणनावाआडून लेखन करतात. “गोडी गुलाबी’ या नावाने मराठीतील एक लेखक पाचकळ लेखन प्रकाशकांकडे पाठवत असे. त्यांचे नाव सांगणे औचित्याला धरुन होणार नाही.
-
ज्यांच्या लेखनास घरातून/स्वजनांकडून विरोध होत असतो, ते लोक टोपणनावाने लेखन पाठवून आपली लेखनाची हौस पूर्ण करत असतात.
-
काही लोक प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोपणनाव धारण करतात.
-
स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही विद्वानांनी व पुरुषवादी लेखन करणाऱ्या काही विदूषींनी त्या साहित्य प्रकारासाठी साजेसे टोपणनाव घेऊन आपले लेखन समाजमनात यशस्वीपणे रुजविले आहे. त्याचप्रमाणे काही लेखिकांनीही आपले नाव उघड होऊ नये म्हणून प्रवाहाविरुद्धचे साहित्य लिहिताना टोपणनावांचा आधार घेतला आहे. त्यामध्ये विभावरी शिरूरकर अर्थात मालती बेडेकर (पूर्वाश्रमीच्या बाळूताई खरे) हे नाव आघाडीवर घेतले जाते.