– श्रीनिवास वारुंजीकर
ग्रेस नामक प्रतिभावान कवीचे मराठी मनावर आगळे असे गारुड आहे; राहीलही. याच ग्रेसच्या सोमवार, दि. 10 मे रोजी येत असलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्याचे, कवितेचे आगळेवेगळे पैलू इथे उलगडून दाखवले आहेत.
“कविता ही कोणाला कधीच वारसाहक्काने मिळत नसते. ती अल्पांशानेही कसलीही मिळकत नसते आणि कविता हे कमाईचे साधनही नसतेच. माझी कविता ही मलाही संपूर्णपणे समजते, असे अजिबात नाही….’ ग्रेस एखाद्या धबधब्यासारखे कोसळत होते; बोलत होते आणि रसिक त्या धारेमधून उडणारे तुषार फक्त टिपत होते; अर्थातच ग्रेसच्या लाडक्या नागपूरच्या “पंथविराम’ या त्यांच्या घरात.
“कवितानिर्मिती ही गोष्टच वेगळी आहे. कविता निर्माण झाल्यानंतर ती कवीच्या बाहेर असते. पण कवीच्या आतून ती निर्माण झाल्याने, कवीच्या सर्व पेशींचा, एकत्रित सत्त्वयुक्त ऐवज, त्या कवितेच्या अंगाखांद्यात निर्माण झालेला असतो. आणि तेवढाच ऐवज कवीच्या शरीरामधून उणा झालेला असतो…..’ स्वत:च्या कवितेविषयी इतकी कमालीची काव्यनिष्ठा बाळगणारा हा कवी म्हणजे ग्रेस. होय. माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच ग्रेस. जन्म ऐन वैशाख वणव्यातला. 10 मे. वर्ष विचारू नका. ग्रेसच्या उपलब्ध नोंदीनुसार जन्म वर्ष 1940. मात्र शालेय नोंदीनुसार जन्म 1937 अर्थात, ते महत्त्वाचं नाहीत. कविता महत्त्वाची.
महत्त्वाचं काय, तर काव्य निर्मिती प्रक्रिया, कवितेतील रूपक-प्रतिमा, कवितेचा रसास्वाद आणि कवी-रसिक नात्याला सन्मान देणारा, आणि हे करत असताना आपली काव्यनिष्ठा जराही ढळू न देणारा एक महनीय कवी आपल्याला समजला की नाही? या कवीचं मोठेपण आपण मान्य करणार की नाही? आदीकवी माणिकराजपासून सुरू झालेली मराठी कविता, केशवसुतांनंतरची आधुनिक मराठी कविता, बा. सी. मर्ढेकरांची युगप्रवर्तक कविता, त्याआधीची रविकिरण मंडळाची कविता आणि मग स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्या सहस्रकाची कविता, असे सारे प्रदेश पादाक्रांत करून, दशांगुळे उरलेली ग्रेसची कविता आपण मनात जपणार की नाही?
“रूपकाची उभारणी आणि रुपकाची बांधणी, यातून प्रसरणशील प्रतिमांचे आणि प्रतिकांचे, संघातच्या संघात, माझ्या कवितेतून निर्माण होत असतात. कुठल्याही एकट अलंकाराच्या मदतीने, माझ्या कवितेत गतिलय आणि स्थितिलय निर्माणच होत नाही. शब्दांचे जिथे विसर्जन झाले आहे, तिथेच ही रुपकाची पाझरणी झुळूझुळू वाहू लागते आणि शब्दांचे विसर्जन होऊन, काव्याचा अर्थातीत अनुभव सुरू होतो…’ ग्रेस बोलत होते. जिथं कवीची, स्वत:च्या काव्यनिर्मितीबाबत इतकी स्पष्ट भूमिका आहे, तर मग या कवितेला दुर्बोध म्हणणार तरी कसं? कवी स्वत: जिथं सांगतोय की, ही कविता म्हणजे अर्थापलीकडचा अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे, तर मग, कविता कळत नाही, ही तक्रार घेऊन कवीकडे जाता येणार नाही.
वर्ष 1967 मध्ये पॉप्युलर प्रकाशनच्या “नवे कवी-नवी कविता’ या मालिकेत ग्रेसचा पहिला कवितासंग्रह आला, “संध्याकाळच्या कविता’ या नावाचा! ही एक ऐतिहासिक घटना होती. पण ते समजायला आणखी काही काळ जायचा होता. त्यानंतर “चंद्रमाधवीचे प्रदेश’ मधून ग्रेसच्या कवितेची तरलता अधिकच उत्कटपणे व्यक्त झाली. “राजपुत्र आणि डार्लिंग’ हा एक अखंड कवितानुभव होता, हे मात्र मराठी वाचकाला उमगलेच नाही. त्यानंतर “सांध्यपर्वातील वैष्णवी’ या पुस्तकाद्वारे ग्रेस पुन्हा एकदा अवतरला. मग “सांजभयाच्या साजणी’ आणि “बाई जोगियापुरुष’ असा एकूण काव्यप्रवास.
ग्रेस यांच्या सृजनप्रक्रियेत जगाचा पसारा नीटपणे मांडून ठेवलेला असायचा. सोबतीला जास्त काळ दु:खाचा काळोख असायचा, ज्याचा आरंभ संध्याकाळच्या संधीप्रकाशाने झालेला असायचा. उजेडही नाही आणि अंधारही नाही, अशी तिन्हीसांजेची, अर्थात संध्याकाळची वेळ, ही माणसांची वेळ नसते, असे आपल्याकडे मानले जाते. ही प्राचीन शक्तींच्या जागरणाची वेळ असते. आत्मे जागे होण्याची वेळ असते. त्या वेळेच्या वीजेसारख्या संधीरेषेवर ग्रेस उभे राहिले आणि मग त्यांनी निर्मितीशक्तीला आवाहन करणारा कवितेचा बीजमंत्र उच्चारला. मग धुसर वातावरणातून त्यांच्याकडे एक विलक्षण दु:खदग्ध असं आकारविहीन, विकारशरण असं अर्थसंचित चालत आलं. या संचितानं ग्रेस यांच्या कपाळावर आपली रक्तखूण उमटवली. हाच त्यांना मिळालेला प्रतिभेचा वर आणि शापही होता. मग काव्यनिर्मितीचा झंझावात आयुष्यभर त्यांच्याभोवती गरगरत राहिला. कळणं आणि न कळणं याच्यातली सीमारेषा संधी प्रकाशाप्रमाणे अंतर्धान पावली. आणि खऱ्या अर्थानं काळावर ठसा उमटवणारा कवी जन्माला आला, तो ग्रेस.
कवितेसाठी ग्रेस शब्दांना उचलायचा, तो त्यांच्या अर्थगुणांना अनुसरून नव्हे. तो शब्दांच्या नादगुणांचं बोट धरायचा. भाषेच्या सर्व शक्यता पडताळून पहात, तरल अशा लयींना वळवत, खेळवत, शब्दांमागच्या अर्थभासां भोवती, त्या लयींची आवर्तनं ग्रेस पेरायचा. अशावेळी संदिग्धतेला आशयाचं वरदान देताना, ते दु:ख जाणीवेचे सारे पदर उलगडायचे. मग ग्रेसची कविता कळत नाही, असं म्हणणाऱ्यांना सांगावसं वाटतं की, शब्दाच्या अर्थाच्या उंबरठ्यावर थबकू नका. अर्थाचे अधांतर पेलतानाचं, ग्रेसच्या वेदनेशी रममाण व्हा. तरच ही कविता कळेल.
निर्मितीप्रक्रिया आणि आत्मशोध ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. ज्यावेळी ग्रेसची कविता कळत नाही, समजत नाही असे आपण म्हणतो, तेव्हा कवितेमधले संदर्भ उकलण्यासाठी, आपण कवीच्या-ग्रेसच्या व्यक्तीगत आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतो. पण तिथेही फारसं काही गवसत नाही. तेव्हा या कविता मग अंधार कोठड्या बनून राहतात की काय, असे वाटू लागते. त्यावर ग्रेस सांगतो की, प्रत्येक प्रतिभावंत कवी, आपल्या निर्मिती प्रक्रियेत आणि अनुभवविश्वातही एकदां तरी, आत्मशोधाच्या टप्प्यावर येतो. भयभीत होतो. त्यावेळी त्याचे भावविश्व, अनुभवविश्व आणि त्याची निर्मिती प्रक्रिया हे एकमेकांसमोर, जन्मोजन्माचे दावेदार असल्यासारखे उभे ठाकतात. याच टप्प्यावर कवीने अत्यंत प्रामाणिकपणे भाषेचा, शब्दांचा हाकारा ऐकायचा, आणि फक्त व्यक्त व्हायचे असते. त्यात कसलाही अभिनिवेश आला तर पाण्यासारख्या पारदर्शक कवितेचे पावित्र्य भंग पावते. अगदी सगळी निर्मितीप्रक्रियाच नासून जाते.
आपली निर्मितीप्रक्रिया आणि आशयसंपन्नता याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या या कवीने मानवी दु:खाचे अभिजात शिल्प खोदण्याचे काम अव्याहत आणि निरंतर केले. त्याच्या शब्दांनी वाचणाऱ्यांच्या मनात विश्वव्याकुळता पेरली. ग्रेसच्या कवितेने मानवी भावनांना थेट काळजात भिडवण्याचे सामर्थ्य दिले. त्याच्या शब्दांचे अर्थवाहीपण इतके प्रवाही असायचे-आहे, की शब्द वितळले तरी अर्थापलीकडचे भावनांचे आकाश भरून जायचे. म्हणूनच ग्रेसच्या कवितेवर अंधारव्रताची समई सतत तेवत असायची. अत्यंत डोळसपणे सूर्यास्ताचे सांजभय ग्रेसच्या कवितेचे बोट धरून चालत असे.
कवितांच्या आजूबाजूने व्यक्त होत असताना ग्रेसने भरपूर असे ललितलेखनही केले. मात्र आपले ललितलेखन म्हणजे आपल्या काव्यनिर्मिती प्रक्रियेचे विवेचन नसल्याचे, ग्रेसने सुरूवातीलाच सांगून टाकले त्यामध्ये सुरूवातीला “चर्चबेल’मध्ये लघुनिबंध, नंतर “मितवा’मध्ये निबंध, मग “संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’ मध्ये ऐसपैस लेखन, मग पुन्हा “मृगजळाचे बांधकाम’ आणि “वाऱ्याने हलते रान’ मध्ये लघुनिबंध. शेवटी “कावळे उडाले स्वामी’ मध्ये विस्ताराने लेखन. आणि अखेरिस “ओल्या वेळूची बासरी’. या सर्व लेखात स्वत; ग्रेसच्या कवितांचे अनेक उल्लेख येतातच, शिवाय मिर्झा गालिब, ज्ञानेश्वर, तुकाराम, मीरा, जर्मन कवी रायनर मारिया रिल्के, स्पॅनिश कवी लोकी, पॉल व्हॅलरी, शिवाय रशियन कादंबरीकर लिओ टॉलस्टॉय, जी.ए. कुलकर्णी, बा. सी. मर्ढेकर अशा असंख्य दिग्गदांचे संदर्भ येतात.
अर्थात हे येणारे सगळे संदर्भ म्हणजे ग्रेसच्या पांडित्याचे दर्शन नसून, सृजनाच्या पातळीवरच्या समानतेचे प्रतिबिंब ठरते. कविता कळायला, समजायला, कवितेने स्वस्त व्हायचे नसते, कवीने आपली पातळी सोडायची नसते. तर आस्वादक वाचकानेही कविता समजून घेण्यासाठी संदर्भाचा अभ्यास करून पूर्वतयारी करणे आवश्यक असते, असे ग्रेस आवर्जून सांगत असे. आपण लिहिलेली कविता वाचकाला ज्याक्षणी कळते, तो क्षण म्हणजेच कवीच्या सृजनक्षणाइतकाच मौल्यवान असतो, असे ग्रेसने सांगितले होते. अशावेळी कवी आणि रसिक यादरम्यान सांधला जाणारा पूल सोनेरी असतो, रत्नजडित असतो, असे ग्रेसचे मत होते. अशा लोक विलक्षण कविला समजून घेण्याची प्रक्रिया जटील नसली तरी ती थोडी गुंतागुंतीची आहे, हे मान्य करावे लागते. तरीही संगीताच्या अत्यंत जवळ जाणारी, तरल, भावस्पर्शी कविता ग्रेसनेच लिहिली आहे, हेही मान्य कराव लागत.
बा. सी. मर्ढेकर यांनी म्हटल्याप्रमाणे
धैर्य दे अन् नम्रता दे
पाहुण्या जे जे पहाणे
वाकुं दे बुद्धीत माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे
या अनुभवाचे दर्शन ग्रेसच्या कवितेतही घडले. ग्रेस म्हणतो की, “कविता लिहिणे म्हणजे इंचाइंचाने मरणे, प्रत्येक कवितेगणिक आणि शेवटी उरणारा कवीच्या देहाचा सांगाडा म्हणजे सोलून, सोलून नक्षीदंत झालेले देहतत्वाचे एक सुभाषितच!’
गोविंद विनायक अर्थात विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, ग्रेसची कविता व्रतस्थ आहे. प्रत्येकाला ती समजलीच पाहिजे असे नाही. असा वृथा अट्टाहास ग्रेसनी कधीच धरला नाही. आपल्या कवितेच्या सामर्थ्यांची साथ जाणीव ग्रेसला होती. त्यामुळे तुम्ही इतरांचे काय ते वाचून घ्या आणि मगच माझ्याकडे या, असे ग्रेस म्हणत असे. व्हेन यु हॅव फिनिइड विथ आदर्स, दॅट इज माय टाइम.
वीणा आलासे, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. प्रल्हाद वडेर, डॉ. अक्षयकुमार काळे आणि डॉ. वसंत आबाजी डहाके यांच्यासह पु. शि. रेगे, मधुकर केचे, डॉ. अरुणा ढेरे अशा अनेकांनी ग्रेसच्या कवितेची समीक्षा केली.
डॉ. जयंत परांजपे यांनी तर ग्रेसच्या कवितेतील दुर्बोधतेवर पुस्तक लिहिले. मात्र एवढे करूनही ग्रेसची कविता सुबोध झाली, असे म्हणता येत नाही. यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, भास्कर चंदावरकर अशा अनेक दिग्गजांनी ग्रेसची कविता संगीतबद्ध केली, संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे तरी कविता समजण्याची प्रक्रिया सुलभ झाली का? तर नाही. मग जी कविता कळत नाही, उलगडत नाही, समजत नाही, तरीही हवीहवीशी का वाटते?
सृजनाचा साक्षात्कार लेखकाला, कवीला, कलावंताला स्वत:ला आधी व्हावा लागतो. तो तसा झाला, तरी सर्वांनाच हा साक्षात्कार पेलवतो असे नाही. केशवसुत म्हणत की, कविता ही आकाशीची वीज आहे. ती हातात पेलू पाहणारे 100 मधले 99 जण जळून खाक होतात. जो एक उरतो, तो आपल्या लिखाणातून काळावर ठसा उमटवतो. ग्रेस या वीज पेलवणाऱ्या कवींपैकी एक कवी आहे. अशी आकाशीची वीज, आयुष्यभर पेलताना होणारी वेदना, दु:ख, मन:स्ताप हे राजवर्खी किंवा देखवे नसतातच. म्हणूनच ग्रेसने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात कुणालाच डोकवू दिलं नाही. आपला आत्मसन्मान टिकवण्यासाठी कशाकशाची किंमत चुकवावी लागते, हे त्याचे त्यालाच कळते, कारण तो एकटाच आत जळत असतो.
मी रहस्य शरणार्थी आहे, असे ग्रेस नेहमी मोठ्या अभिमानान म्हणत असे. ग्रेस स्वत:ला फेमिनाइन पोएट असंही म्हणवून घेत असे. मात्र त्यांच्या कवितेतल स्त्रीत्व हे स्त्रीत्वाच भांडवलही नाही किंवा तक्रारखोरही नाही, ते स्त्री-पुरुष भावनेच्या पलीकडे जाणारे वैशिष्ट्य आहे, असंही ग्रेसनी सांगितल आहे. म्हणूनच ग्रेसची कविता हा केवळ शब्दांचा खेळ नव्हता. प्रतिमा-प्रतिकांची आरास म्हणजे ग्रेसची कविता नव्हती तर अतर्क्य, अनाकलनीय, अपरंपार सुंदर असे भावविश्व म्हणजे ग्रेसची कविता आहे. प्रत्येक कवितेचा भाव काळजापर्यंत पोहोचवण्याची क्षमता या कवितेत आहे. त्यामुळेच कळत नसली तरी ही कविता तुम्ही-आम्ही मनात जपली आहे.
म्हणूनच मराठी भाषेच्या काव्यव्यापाराचा वेध घेताना ग्रेसला वगळून किंवा वळसा घालून कोणालाही जाता येणार नाही. आज कविता लिहित असलेल्या कवींमध्ये 90 टक्क्याहून जास्त लेखन हे मुक्तछंद किंवा फ्रिफॉर्म प्रकारचे लेखन करताना दिसत आहेत. मात्र ग्रेसच्या कवितेत पादाकुलक, पृथ्वी, आर्या, मंदारमाला आणि शार्दूलविकिडित अशा अनेक वृत्तांचा समर्पक वापर केलेला दिसतो. शिवाय ग्रेसच्या कवितेत भाषा, व्याकरण, संदर्भ किंवा रचनेच्या पातळीवर कुठेही धक्के बसत नाहीत. एका अर्थाने ग्रेसच्या कवितेला विशुद्ध भावकविता अर्था प्युअरेस्ट पोएट्री म्हणता येईल.
ग्रेसच्या कवितेतल्या दु:खाचा मूलाधार काय आहे, असे अनेकांनी विचारले होते. मात्र कोणालाही ते नीटसे सांगता आले नव्हते. एकदा ग्रेसने सांगितले होते की, मी आजवर माझ्या कवितांमधून जो काही व्यक्त झालेय, ते माझ्या अभिव्यक्तीचे 4 ते 5 टक्केच प्रकटीकरण आहे. उरलेले 95 ते 96 टक्के अभिव्यक्ती माझ्याबरोबर संपून जाणार आहे. मला समजत नाही, मी काय करू? ग्रेसची खरी वेदना होती ती त्यांनी अशी बोलून दाखवल्याने, त्याच्या सगळ्या कवितांकडे पाहण्याचा रसिकांचा दृष्टीकोनच बदलून गेला.
विदर्भ साहित्य संघाच्या “युगवाणी’ या त्रैमासिकाचा संपादक, “रायटर्स सेंटर’च्या “संदर्भ’ नियतकालिकाचा संपादक, राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचा सदस्य, डॉ. लीला माटे यांचा जीवनसाथी, राघव, डॉ. मिथिल, डॉ. माधवी यांचा सहृदय पिता आणि लक्षावधी काव्यरसिकांचा आवडता कवी, अशा भूमिका निभावताना आपली काव्यजाणिव आणि काव्यनिष्ठा प्राणपणाने जपणारा माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच ग्रेस!
– श्रीनिवास वारुंजीकर