नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी तत्परता दाखवली. पण, इस्त्रो आणि शास्त्रज्ञांना मदत करण्यात मोदी सरकारला अपयश आले, असे जोरदार टीकास्त्र कॉंग्रेसने गुरूवारी सोडले. भारताला चंद्रावर नेण्याची अद्भुत आणि ऐतिहासिक कामगिरी इस्त्रोने बुधवारी करून दाखवली. ती मोहीम फत्ते झाल्याची घोषणा होताच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या मोदींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. त्याचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांनी केले.
त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावरून मोदींना लक्ष्य केले. चांद्रयान-3 च्या लॅंडिंगचा उत्साह आणि अभिमान प्रदीर्घ काळापर्यंत आमच्या समवेत असेल. इस्त्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांच्या नेतृत्वाने खऱ्याअर्थी इतिहास रचला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आणि त्यांच्या टीमचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
पण, मोदींना काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. लॅंडिंगनंतर स्क्रिनवर येऊन श्रेय घेण्याची तत्परता मोदींनी दाखवली. मात्र, त्यांचे सरकार इस्त्रो आणि शास्त्रज्ञांच्या पाठिशी उभे राहण्यात सपशेल अपयशी का ठरले? चांद्रयान-3 मोहिमेत हेवी इंजिनियरींग कॉर्पोरेशनने योगदान दिले. त्या कॉर्पोरेशनच्या अभियंत्यांना मागील 17 महिने वेतन का मिळाले नाही? महत्वाच्या मोहिमांसाठीच्या बजेटमध्ये 32 टक्क्यांची कपात का करण्यात आली, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
जागतिक दर्जाचा अवकाश संशोधन कार्यक्रम राबवणारे आपल्या देशाचे हिरो आहेत. मात्र, त्यांच्या प्रतिभेची आणि कठोर मेहनतीची कदर मोदींना असल्याचे वाटत नाही. ऐतिहासिक स्वरूपाचा क्षण शास्त्रज्ञांच्या कामगिरीशी संबंधित होता. पण, मोदींनी प्रसिद्धी मिळवली, अशी उपहासात्मक टिप्पणीही वेणुगोपाल यांनी केली.