पुणे, दि. 9 (टीम उपनगर) – “शिवसेनेचे चिन्ह गोठविले, मात्र विचार कसे गोठवणार’ बाळासाहेब ठाकरे हे नाव घराघरापर्यंत पोहचले आहे. ज्या विरोधकांनी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी वेगळे झालो असे सांगितले तो विचारच संपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना कधीही संपणार नाही. त्यामध्ये आम्ही शिवसैनिक ठाकरे आणि “मातोश्री’शी एकनिष्ठ आहोत. या निर्णयामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या. निवडणूक आयोगाने शनिवारी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर “प्रभात’ने ही मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांसह अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे.
कोथरूड
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कशा परिस्थितीत घेतला, हे सर्वांना माहिती आहे. नक्कीच या निर्णयामुळे आम्हाला दु:ख आहे. शिवसैनिक हा सक्षम आहे. बाळासाहेब ठाकरे हे घराघरांत पोहचलेले आहे. त्यामुळे चिन्ह गोठविले म्हणून शिवसेना संपली असे समजू नये. आम्ही पुन्हा त्याच जोमाने पक्षाचे चिन्ह घराघरापर्यंत पोहचू. शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेईल. – पृथ्वीराज सुतार, माजी गटनेते, शिवसेना, मनपा
चिन्ह गोठविले तरी आम्हाला फरक पडत नाही. शिवसेनेचा एकच ब्रॅंड ठाकरे. भाजपला शिवसेना संपवायची होती, परंतू त्यांना यश मिळाले नाही. मात्र, घरातलेच फुटले आणि भाजपने त्यांना पाहिजे ते करून घेतले. अंधेरीची निवडणूक लढवायची नव्हतीच तर चिन्ह गोठवण्याचा निर्णय का? – गजानन थरकुडे, शहरप्रमुख
चिन्ह गोठवतील, मात्र विचारांचे काय? बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचार, त्यांची शिकवण आणि घराघरापर्यंत पोहचलेली शिवसेना कशी गोठवतील? प्रत्येक मतदार हा सुक्षित आहे. त्याचा चिन्हाशी घेणे-देणे नाही. तो पक्ष, त्याचे विचार आणि त्या पक्षाचा उमेदवार हे पाहूनच मतदान करतो. त्यामुळे विचारांचे चिन्ह’ हे कधीही कोणीही संपवू शकत नाही. – ऍड. योगेश मोकाटे, माजी नगरसेवक
विरोधकांनी आज बाळासाहेबांचे विचारच संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे शिवसेना संपली असे समजू नका. शिवसेनेत पदापेक्षा पक्षाला प्रथम स्थान. पद येतात-जातात पक्ष आणि त्याचे विचार शेवटपर्यंत राहतात. ज्या पक्षाचा जोरावर तुम्ही मोठे झाला, त्याच पक्षाचे चिन्ह गोठविण्याची वेळ आणली. हे जनता विसरणार नाही, – सचिन बबनराव दगडे, उप जिल्हा संघटक
चिन्ह गोठविले, मात्र शिवसैनिकांचे रक्त पेटवले. या निर्णयामुळे विरोधकांना वाटेल शिवसेना संपली. मात्र, हे शक्य नाही. शिवसेना ही विचारांची संघटना असून, प्रत्येक खरा शिवसैनिक हा ठाकरे आणि मातोश्री यांच्यांशी एकनिष्ठ आहे. शिंदे गटाच्या कृतीतून स्पष्ट दिसते की त्यांनी भाजपचा अजेंडा चालविला. मात्र, जनता याचे उत्तर मतदानातून नक्कीच देईल. – उमेश भेलके, विभाग संघटक, कोथरूड
मुळशी
शिवसेना हा नुसता पक्ष नाही, तर तो मोठा परिवार आहे. तो कधीही तुटणार नाही. आम्हाला सेना वाढवायची आणि जगवायची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विश्वासास पात्र आहे. जे गेलेत ते स्वार्थासाठी गेलेत. धनुष्यबाण तात्पुरते गोठवले गेले आहे. ते चिन्ह परत आम्हांलाच मिळणार आहे. – बाळासाहेब चांदेरे, शिवसेना, जिल्हा प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेले मोठे नेते जरी पक्ष सोडून गेली असतील, तरी तळागाळातील शिवसैनिक हा कदापि पक्ष सोडणार नाही. येणाऱ्या काळात शिवसेना नव्याने आणि नव्या जोमाने चांगल्या प्रकारे यश संपादन करून पुन्हा मोठ्या प्रमाणात उभी राहिल.
– प्रा. सौ. सविता दगडे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद..
शिवसेना आणि धनुष्यबाण यावर अधिकार हा मूळ सेनेचाच आहे. निवडणूक आयोगाने नाव गोठवले असले, तरी नवीन चिन्ह घेऊन शिवसेना नव्या जोमाने जनतेपर्यंत पोहचू शकले. यावरुन भाजप हिटलर शाहीकडे चालला आहे, असे दिसून येते. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर जाणे, ही धोक्याची घंटा आहे. – महादेव कोंढरे, अध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवणे, हे तर भाजपचे षडयंत्र आहे. फुटलेल्या गटाची शिवसनेबद्दल चुकीची वाटचाल आहे. सामान्य जनतेसह संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय एकतर्फी आहे. – ऍड. सुरेश मोहोळ, अध्यक्ष, पुणे शहर ग्राहक संरक्षण समिती
प्रत्येकाला संघटना चालविण्याचा अधिकार आहे आणि मूळच्या शिवसेनाला तो मिळालेला आहे. शिंदे गट अशा पद्धतीने अपप्रवृत्तीकडे चालला आहे. काळाच्या ओघात आणि भविष्य काळात शिंदे गट फार काळ टिकणार नाही. तर या उलट नामशेष होईल.ज्यांनी, ज्यांनी फितुरी केली, ते फार कधीच टिकले नाहीत. – सुनील चांदेरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
कात्रज
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह व नाव तात्पुरत्या स्वरूपात का होईना गोठवून टाकले. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे का? असे निर्णय होत राहिले तर हा प्रकार लोकशाहीचा गळा घोटल्यासारखाच आहे. निवडणूक आयोगाने त्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा करून योग्य तो निर्णय घेतला तर बरे होईल. कायद्याचे पालन करणे हे आम्हा शिवसैनिकांचे काम आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आम्ही नाराज आहोत. – ऍड. संभाजीराजे थोरवे. पुणे शहर समन्वयक शिवसेना, ठाकरे गट
बाळासाहेबांचे विचाराचे वारसदार सांगणारे आज त्यांच्याच पक्षाच्या मुळावर उठलेले आहेत. पक्षाचे चिन्ह गोठवलं पण त्यातून त्यांनी पक्ष संपवला, असं समजायचं कारण नाही. आयुष्यभर बाळासाहेबांच्या नावावर मतं मागितली. पद-तिष्ठा मिळवली. याचा राग प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे. तो येणाऱ्या निवडणुकीतून दिसेल. – कुणाल धनवडे, युवा सेना अध्यक्ष, खडकवासला
सद्यस्थिती पाहता राजकारण रसातळाला गेल्याचे दिसून येत आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह गोठवले तरी तो पक्ष काही संपत नाही. त्याचे विचार संपत नाहीत. आता पाहिले, तर चिन्ह गोठून त्यांना दुसरे चिन्ह देण्याचे विचार सुरू आहे. त्या संदर्भात अधिक बोलणे उचित ठरणार नाही. – वसंत मोरे, माजी शहर प्रमुख, मनसे
शिवसेना उद्वव ठाकरे गट जो शिवसेनेचा मूळ मानणारे जे पारंपरिक मतदार आहे. ते अधिक मजबुतीने पाठिंबा देऊन पक्ष मजबूत करण्यास मदत मोठ्या प्रमाणात करतील असे वाटते. बाकी आताच्या राजकीय स्थितीवर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही. – विशाल तांबे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. तो मान्य करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आयोग पाळत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षावर विश्वास आहे. – वर्षा तापकीर, प्रदेश उपाध्यक्ष भाजप
सिंहगड रस्त्यावरील दोन्ही गट संभ्रमात
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला सिंहगड रस्ता-खडकवासला मतदारसंघातील शिवसैनिक सध्या संभ्रमात सापडला आहे. त्यांचा पक्ष विभागला गेला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवले. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये चिन्ह नाही, नाव नाही तर काम कसे करायचे? असे प्रश्न उभे राहिले आहेत.
बंडखोरी करून “आमचीच खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचाराचे आम्हीच पाईक आहोत’ असं म्हणत जे मुख्यमंत्री झाले, आज तेच शिवसेना संपवू पाहत आहेत. चिन्ह आणि नाव जरी गोठवले गेले असले तरी शिवसेनेचे विचार हे जनमानसात खोलवर रुजलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे आम्ही आमच्या शिवसैनिकांपर्यंत, मतदारांपर्यंत नक्कीच पोहोचू. – नितीन वाघ, प्रमुख, शिवसेना-खडकवासला
चिन्ह आणि नाव नसले, तरी त्याचा फायदा शिवसेनेलाच होणार आहे. शिवसेना हा पक्ष कधीही संपणार नाही. दसरा मेळाव्याच्या शिवसैनिकांच्या आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून हे आपल्या लक्षात येईल. शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्व समावेशक आहे. निष्ठावंत शिवसैनिक विकला जाऊ शकत नाही. – महेश पोकळे, खडकवासला विभाग प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविषयी मुख्यमंत्री लवकरच आपली भूमिका जाहीर करतील. मुख्यमंत्री जी काही भूमिका घेतील, आदेश देतील त्यांचा शब्द अंतिम राहील. तोपर्यंत वेट आणि वॉच. – रमेश कोंडे, जिल्हाप्रमुख, शिंदे गट
बिबवेवाडी
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावचं महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांचे नाव आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल थोडा संभ्रम आहे. पण, खरा शिवसैनिक लढवय्या असतो. तो रडणार नाही, तर लढणार आणि जिंकून पण दाखवणार. भविष्यात जनता आमच्यासोबतच असेल, हा आम्हाला विश्वास आहे. जनता दरबारात सत्याचाच विजय होईल – बाळासाहेब ओसवाल, माजी नगरसेवक, शिवसेना
निवडणूक आयोगाचा निर्णय पाहता भाजप आणि आमचे फुटलेले आमदार शिवसेना पक्ष संपावण्याबाबत कटकारस्थान करत आहेत. त्यांचा हा डाव आम्ही शिवसैनिक उधळून लावू. शिवसेनेविरोधात त्यांच्या हालचाली यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही सदैव शिवसेनेसोबतच आहोत. – अमोल रासकर, शिवसेना कार्यकर्ता
चिन्ह आणि नाव वापरता येणार नाही. ते गेले म्हणून काही फरक नाही पडणार. कारण, शिवसैनिकांकडे तत्व आहे. त्यामुळेच त्याचे कायम महत्त्व राहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशिवाय विरोधक आमदारांचे काही चालू शकत नाही. ही सुरुवात आहे नव्या अध्यायाची. लढवय्येपणा प्रामाणिकता शिवसैनिकांच्या रक्तात आहे. – सूरज लोखंडे, कार्यकर्ता शिवसेना
फुरसुंगी
शिवसेनेचे चिन्ह व नाव गोठविण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय यातना देणारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जीवाचे रान करुन शिवसेना वाढवली. त्यामुळे चिन्ह गेले म्हणुन आम्ही खचणार नाही. नव्या जोमाने व जोशाने पुन्हा उभी करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करुन भाजप हे कारस्थान रचत आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शिवसेनेचे युग पुन्हा येणार.
– महादेव बाबर, माजी आमदार
भाजपने हे षडयंत्र रचून एक हिंदुत्ववादी संघटना-पक्ष संपवून आपणच हिंदुंचे कैवारी उरलो आहोत, हे दाखविण्यासाठी कट-कारस्थान रचले आहे. एरव्ही शिवसेनेच्या याचिकांवर तारीख पे तारीख मिळते. पण, शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे देऊनही चार तासांत निर्णय घेऊन धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाते, हे दुर्दैवी आहे. या प्रवृत्तींना घरी बसविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. आम्ही शिवसैनिक रात्रीचा दिवस करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी उद्घव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. जनता जनार्दनही उद्धवसाहेब आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. येणाऱ्या निवडणुकीतून हे स्पष्टच होणार आहे. – संदीप (धाडसी) मोडक, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख
भाजपच्या मागे जाऊन या 40 जणांनी शिवसेना संपविण्याचे कट कारस्थान रचले आहे. आता चिन्ह गोठवले म्हणून शिवसेना संपली, असे त्यांना वाटत असेल, परंतु असे कदापि होणार नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी उभारी घेऊन पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवू. आमचे चिन्ह उद्धव ठाकरे हेच असून जे चिन्ह मिळेल ते घेऊन आम्ही आगामी निवडणुका जिंकू. संघटना वाढवू. कारण आमच्याकडे ठाकरे हे नाव आहे. ते तर कोणी हिरावून घेऊ शकत नाही.. – उल्हास शेवाळे, शिवसेना शहर-जिल्हा उपप्रमुख