66 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
माळेगाव – “सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांची गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याशी माझा संबंध नाही; पण, त्यांचं कॉल रेकॉर्ड ऐकवलं तर तोंड दाखवणे मुश्किल होईल. “माळेगाव’चे विरोधक मात्र आमचे अडीच वर्षाचे सरकार पडले की लगेच 10 गावे जोडण्याच्या मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये दुफळी माजवत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
शरद पवारसाहेब आणि मी बारामतीकरांचे अथवा माळेगावच्या सभासदांचे कधीही नुकसान केले नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 66 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, प्रशांत काटे, योगेश जगताप, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, सचिन सातव, संदीप जगताप, पोर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.
10 गावांच्या मुद्यांवर पवार म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये दुफळी माजवत आहेत. त्यांचे कॉल रेकॉर्ड सभासदांना ऐकविले तर त्यांना या वयात तोंड दाखविणे मुश्किल होईल. विस्तारीकरण झालेल्या माळेगावचे कार्यक्षेत्र खूपच कमी असल्याने सोमेश्वरची 10 गावे जोडण्याचा विचार पुढे आला. मात्र, त्या विषयाशी माझा कसलाही संबंध नाही, तो विषय सभासद व संचालक मंडळाच्या स्तरावर हाताळावा, अशी सूचना त्यावेळी केली.
अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी 3100 रुपये अंतिम भावातील उर्वरित 220 रुपये प्रतिटन एकरकमी सभासदांना दिवाळीला देण्याचे जाहीर केले. 70 रुपये गेटकेनधारकांना सोडल्याची माहिती दिली. कामगारांनाही अधिकचा बोनस देणार असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी स्वागत केले, तर प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.
गैरसमज करू नका
पवार म्हणाले की, “माळेगाव’ला सोमेश्वर कारखान्याची 10 गावे जोडण्याचा विषय भविष्यात ऊस टंचाईचा संभाव्य धोक्यातून पुढे आला. त्याचा सभासद भावांनो गैरसमज करून घेऊ नका. बंद पाइपलाइनद्वारे नीरा डावा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी हेच शहाणे विरोधक करीत होते. आता मात्र अस्तरीकरणाच्या मुद्यांवरून शेतकऱ्यांना भडकवितात, असेही पवार यांनी सांगितले.