मुंबई – केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना 3 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 रोजी संपत होता. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतला.
दास यांनी करोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी संयमाने अनेक उपाययोजना केल्या. त्यानी प्रदिर्घ काळ व्याजदर कमी पातळीवर ठेवले. त्याचबरोबर रुपया संतुलीत ठेऊन भांडवल सुलभता कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळातही ते हे काम चांगल्या पध्दतीने होऊ शकणार आहे.
शक्तीकांत दास याआधी अर्थमंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यानंतर त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. या फेरनिक्तीने ते डिसेंबर 2024 पर्यंत या पदावर काम करतील. त्यांनी अर्थविभाग, कर प्रणाली, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
शक्तीकांत दास यांनी याआधी जागतिक बॅंक, आशियन डेव्हलपमेंट बॅंक, न्यू डेव्हलपमेंट बॅंक, आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बॅंक या ठिकाणी भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. अर्थमंत्रालयात असताना त्यांनी जवळपास 8 अर्थसंकल्प तयार करण्यात थेट भूमिका निभावलेली आहे. दास यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
शक्तीकांत दास यांची उर्जित पटेल यांच्या जागेवर आरबीआयचे गव्हर्नर पदी नियुक्ती झाली होती. उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या स्वायत्तेबद्दल सरकारशी झालेल्या मतभेदानंतर तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. यानंतर शक्तीकांत दास यांची नियुक्ती झाली.