नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांना आणखी महिनाभर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या विमानांची उड्डाणे 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. अर्थात, निवडक हवाई मार्गांवर विशेष परवानगी असणारी उड्डाणे आधीप्रमाणेच होतील.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी संबंधित निर्णय जाहीर केला. भारतात करोना संकट दाखल झाल्यानंतर 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना स्थगिती देण्यात आली. त्या स्थगितीची मुदत नियमितपणे वाढवण्यात आली. मात्र, परदेशांतून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मे 2020 पासून वंदे भारत अभियानांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली.
त्यानंतर भारताने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आदी 28 देशांशी द्विपक्षीय करार केले. त्याअंतर्गत मागील वर्षाच्या जुलैपासून भारत आणि संबंधित देशांमधील उड्डाणांना परवानगी देण्यात आली. आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवा सुरूच राहील.