पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागानुसार अंतिम मतदार याद्या शुकवार (दि.22) रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 24 मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत मिनी विधानसभा ठरत आहे. या प्रभागात सर्वाधिक 51 हजार 989 इतके मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक 34 थेरगाव, बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी हा सर्वात कमी 22 हजार 412 मतदार संख्येचा प्रभाग ठरला आहे.
महापालिकेच्या मतदार याद्यांवर 8 हजार 700 हरकती आल्या होत्या. या हरकतींची निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी समक्ष पाहणी केली आहे. त्यानुसार तब्बल 86 हजार मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आले आहेत. या अंतिम मतदार याद्या करताना राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजपच्या नेतेमंडळींना अनुकूल केल्याची चर्चा आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 5 लाख 86 हजार 849 मतदार आहेत. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघात 5 लाख 27 हजार 799, पिंपरी विधानसभेत 3 लाख 76 हजार 470 आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगावात 9 हजार 575 मतदार आहेत.
निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, महापालिकेचे एकूण 46 प्रभाग असून सदस्य संख्या 139 आहे. सर्व प्रभागातील अंतिम मतदार याद्या महापालिकेने जाहीर केल्या आहेत. मतदारांकडून प्राप्त झालेल्या हरकत सूचनांवर संबंधित प्रगणक, पर्यवेक्षकांमार्फत समक्ष स्थळ पाहणी करून बदल करण्यात आले आहेत.
महिला मतदारांची संख्या एक लाखाने कमी
एकूण 15 लाख 693 मतदार आहेत. त्यापैकी 12 हजार 564 वगळलेले म्हणजे स्थालांतरित किंवा मयत झालेले मतदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 114 मतदारांना हक्क बजाविता येणार आहे. एकूण पुरुष मतदार 8 लाख 384, महिला मतदार 6 लाख 87 हजार 642, इतर 88 असे 14 लाख 88 हजार 114 मतदार आहेत. याचाच अर्थ की महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत एक लाख 12 हजाराने कमी आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ
अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्याची 21 जुलै पर्यंत मुदत होती. मात्र, गुरूवारी रात्री उशिरा मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही शुक्रवारी सायंकाळपर्यंत चार प्रभागातील मतदारांची आकडेवारी अंतिम झाली नव्हती. महापालिका निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या सावळा गोंधळामुळे संकेतस्थळावर मतदार याद्या शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत प्रसिध्द झाल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुकांना, नागरिकांना याद्या पाहण्यास मिळाल्या नाहीत.