रत्नागिरी: कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
दरड कोसळल्याने सात कुटुंबातील १७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या माहितीनुसार धामणंद बौद्धवाडी येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये सात कुटुंबातील १७ जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच या ढिगाऱ्याखाली २४ जनावरे देखील अडकली आहेत. या घटनेत दहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळून काही जण ढिगाऱ्याखाली सापडले आहेत.
चिपळूण तालुक्यातील कुभाली येथेही घाटात दरड कोसळली होती. तेथील दरड हटवण्यात आली आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गांवर आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद पडली आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.