मुंबई – मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थामुळे त्रस्त आहे. यामुळे ते नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील हजर राहू शकले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार द्यावा असे सल्ले विरोधकांकडून देण्यात आले होते. त्यातच आता शिवसेना नेत्यानेच मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात असे म्हटले आहे. रश्मी ताईंची काम करण्याची पद्धत, एक अभ्यासू महिला म्हणून त्यांचे जे नियोजन असते. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असते. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात, असंही सत्तार म्हणाले.
दरम्यान आदित्य साहेब कसे काम करतात, मोठे साहेब कसे काम करतात, या सर्वांपेक्षा एक महिला म्हणून त्यांचे नियोजन कसं असते, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत यासाठी त्यांचे काम मोठे आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल तर मला वाटते काहीही होऊ शकते. त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते असे नमूद करत सत्तार यांनी वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.