नवी दिल्ली – देशातील सहा राज्यांत करोनाच्या केसेस पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याची गंभीर दखल घेत केंद्राने या राज्यात तातडीने काही पथके पाठवली आहेत.
केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड आणि मणिपूर अशी या राज्यांची नावे आहेत. ही पथके राज्यांना कोविड नियंत्रणाबाबत सहाय्य करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दोन सदस्यांच्या या उच्चस्तरीय पथकांमध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि क्लिनिशियनचा समावेश करण्यात आला आहे. ही पथके या राज्यांमध्ये तातडीने दाखल होऊन तेथील करोना नियंत्रणाबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेऊन संबंधित राज्यांच्या यंत्रणांना मार्गदर्शन करणार आहेत.
वैद्यकीय यंत्रणा, हॉस्पिटल्समधील बेड्सची उपलब्धता आणि अन्य वैद्यकीय सामग्रीच्या उपलब्धतेचा यात आढावा घेतला जाणार आहे. या राज्यांमध्ये करोना पुन्हा वाढण्याची कारणे काय याचाही शोध ही पथके घेतील आणि त्या राज्यातील एकूणच वैद्यकीय स्थितीविषयी प्रत्यक्ष जागेवर जाऊन फर्स्ट हॅंड रिपोर्ट घेतला जाणार आहे.