नवी दिल्ली – भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला एकाही आयसीसीच्या स्पर्धेत यश मिळवता आलेले नाही. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच रवी शास्त्री यांच्यासाठी आता धोक्याची घंटा वाजलेली आहे. रवी शास्त्री यांची जागा आता द वॉल राहुल द्रविड घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सध्या भारताचे दोन वेगवेगळे संघ इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. माजी कर्णधार द्रविड हे मुख्य प्रशिक्षक म्हणून एका संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहेत. जरी ही तात्पुरती व्यवस्था असली तरी आगामी काळात द्रविडला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाण्याची चर्चा सुरू आहे. शास्त्रींनी चांगली कामगिरी केली आहे, पण त्यांचा कार्यकाळही संपुष्टात येत असल्यामुळे द्रविडला नेमले जाणार आहे.
द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्याशी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत चर्चाही झाल्याचे सांगितले जात आहे.
द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय युवा खेळाडूंचे उत्तम मार्गदर्शन झाले आहे. 19 वर्षांखालील आणि भारत अ संघांच्या प्रशिक्षकपदाची भूमिका निभावल्यानंतर आता तो राष्ट्रीय संघासह श्रीलंकेत आहे. द्रविडचे मार्गदर्शन आणि शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष लागले आहे.
संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून शास्त्री यांची वाटचाल स्वप्नवत सुरू होती. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोहली आणि कंपनीची देशातीलच नव्हे तर परदेशातील कामगिरीदेखील सरस होत होती. मात्र, आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गमावल्यानंतर भूतकाळातील त्यांचे यशापयश मोजले जाऊ लागले आहे.