अवघ्या अर्ध्या तासात मिळणार तपासणी अहवाल
पुणे – करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तसेच “हायरिस्क’ असलेल्या संशयित व्यक्तींच्या “रॅपिड अँटिजेन टेस्ट’ करण्यात येणार आहेत. बुधवारपासून ही तपासणी सुरू होणार आहे. यासाठी महापालिकेने तब्बल 1 लाख किट मागवल्या आहेत.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली. विशेष म्हणजे, या टेस्टचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात मिळणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. हे किट कसे वापरायचे, याचे प्रशिक्षण संबंधित कंपनीने महापालिकेच्या डॉक्टर तसेच स्टाफला शनिवारी झूम ऍपद्वारे दिले आहे.
अत्यंत तातडीच्या प्रसंगी रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी “आयसीएमआर’ने मान्यता दिलेली आहे. या टेस्ट किटचा वापर कंटन्मेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे शक्य आहे. तसेच अतिजोखमीच्या रुग्णांसाठी त्यात, हृदयरोग, फुप्फुस, किडनी, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, एचआयव्ही बाधित अशा व्यक्तींच्या तातडीच्या तपासणीसाठीही मान्यता आहे. सध्या बाधित रुग्ण आढळल्यानंतर संपर्कातील सर्वांना चाचणीसाठी नेले जाते. शहरात सरासरी एका बाधितामागे असा जवळचा संपर्क असलेल्या 10 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे पालिकेस या सर्वच संशयितांच्या चाचण्या कराव्या लागतात. तर चाचण्यांची क्षमता कमी असल्याने हे अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे या सर्व व्यक्तींना पालिकेस संस्थात्मक विलगीकरणात तीन ते चार दिवस ठेवावे लागते. त्यासाठी त्यांच्या वाहतूक, जेवण आणि वास्तव्याची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, “रॅपिड अँन्टिजेन टेस्ट’मुळे हा ताण कमी होणार आहे.
बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेतल्यानंतर अवघ्या अर्धा तासात संपर्कातील करोना बाधा झालेले इतर व्यक्ती सापडणार आहे. त्यांना लक्षणे नसल्यास घरीच विलगीकरणात ठेवता येणार आहे. तर उर्वरित बाधा न झालेल्या सर्वांना घरी सोडणे शक्य होणार असून संभाव्य खर्च टळणार आहे.
मृत्युदर रोखण्यास होणार मदत
“रॅपिड अँटिजेन टेस्ट’चा अहवाल अर्ध्या तासात मिळताच इतर बाधा झालेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार शक्य होणार आहेत. ही तपासणी होईल, तेव्हा या रुग्णांना लक्षणे नसतील. त्यामुळे ते इतर व्याधींनी ग्रस्त असतील तर त्यांच्यावर वेळीच करोनाचे उपचार सुरू केले जातील. त्यामुळे महापालिकेने पुढील काळात ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिलांची घरीच जाऊन ही टेस्ट करण्यासाठीही हालचाल सुरू केली आहे. यातून संभाव्य मृत्यू टाळता येणार आहेत.