मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केलेल्या खळबळजनक विधानामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलीक यांनी राणेंवर सडकून टीका करत “राणेंचं ते विधान म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांचाच अपमान नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे”, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले कि, “नारायण राणे मुख्यमंत्र्यांसाठी जी भाषा वापरत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी विधानं करत आहेत तो फक्त मुख्यमंत्र्यांचाच अपमान नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. हे कधीही सहन होऊ शकत नाही. लोकांना कळलं पाहिजे कि, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कितीही मोठा व्यक्ती असली तरी निश्चितपणे कायदेशीर कारवाई होणारच.”
“भाजपने ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये हिंसक राजकारण सुरु केलं. तेथील वातावरण बिघडवण्याचा काम केलं तेच राजकारण आता त्यांना महाराष्ट्रात करायचं आहे. पण महाराष्ट्राची जनता हे कधीही स्वीकारणांर नाही.
भाजपला देखील हे कळायला हवं कि, ही भाषा अशोभनीय आहे. अशी भाषा आणि असं राजकारण महाराष्ट्राची जनता कधीही स्वीकारणार नाही. कोणीही कितीही मोठा असो, त्यांच्यावर कारवाई होणारच”, असे म्हणत नवाब मलिक यांनी भाजपला सूचक इशारा देखील दिला आहे.