मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राणा दाम्पत्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणा दाम्पत्याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावेळी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती या दाम्पत्यांनी केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या याचिकेवर आज दुपारी २.३० वाजता सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याला मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या जामीन अर्जावर येत्या २९ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे येत्या २९ तारखेपर्यंत त्यांचा मुक्काम हा तुरुंगातच असेल. राणा दाम्पत्यावर १५३ अ सोबतच १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्यात आले आहे. याशिवाय कलम ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही राणा दाम्पत्यावर दाखल झाला आहे.