मुंबई : योगगुरु बाबा रामदेव हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहत असतात. आता असेच एक विधान समोर आले आहे. “कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक ९९ टक्के वेळ स्वतःचा स्वार्थ साधण्यात घालवतात. तर माझ्यासारखे साधू स्वतःचा वेळ समाजाच्या भल्यासाठी वापरतात. तसेच मी तीन दिवस याठिकाणी राहिलो, हा वेळ अदाणी, अंबानी सारख्या अब्जाधीशांपेक्षाही माझ्यासाठी मुल्यवान वेळ होता,” असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
गोव्यामध्ये रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला रामदेव बाबा यांनी स्वतःच्या वेळेबाबत केलेले वक्तव्य सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. यावेळी केलेल्या भाषणात रामदेव बाबा यांनी, “मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी याठिकाणी आलो आहे. माझ्या वेळेचे मूल्य हे अदाणी, अंबानी, टाटा, बिर्ला यांच्यापेक्षाही अधिक आहे. कॉर्पोरेटमधील भांडवलदार ९९ टक्के वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी खर्च करतात, तर साधू स्वतःचा वेळ समाजाच्या भल्यासाठी वापरतात.” असे म्हटले.
तसेच पुढे बोलताना, रामदेव बाबा यांनी आचार्य बालकृष्ण यांचे कौतुक केले. पतंजलि कंपनीला पुनर्जीवित करुन या आर्थिक वर्षात कंपनीचा टर्नओव्हर ४० हजार कोटींवर पोहोचला असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.
तोट्यात चालणाऱ्या कंपनीला आचार्य बाळकृष्ण यांनी व्यावसायिक दृष्टीकोन, पारदर्शी व्यवस्थापन आणि उत्तरदायी नेतृत्व दिल्यामुळे पंतजलिचा टर्नओव्हर हजारो कोटींवर पोहोचला आहे. भारताला ‘परम वैभवशाली’ बनविण्यासाठी पंतजलि सारखे साम्राज्य उभे राहायला हवेत, असेही बाबा रामदेव म्हणाले.