मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला.तर मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना राऊतांची जीभ घसरली होती. संजय राऊतांच्या या आरोपावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राऊतांच्या आरोपावर बोलताना कदम यांनी ‘संजय राऊत हे खरे शिवसैनिक नाहीत. पण उसणं अवसान आणून आपणच शिवसेना वाचवत आहात, असा अविर्भाव दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला फसवत आहात, अशी टीका रामदास कदमांनी केली. तसेच संजय राऊतांच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत, असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.
संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना कशा पद्धतीने अश्लील भाषेत शिव्या दिल्या होत्या,याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. राऊतांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, “संजय राऊतांना मी एवढंच सांगेन की, मी कालपर्यंत गप्प बसलो होतो. मी संजय राऊतांवर कधीही टीका केली नव्हती. पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. संजय राऊत आपण विसरला असाल, पण मी विसरलो नाही.”
“ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती केली. तेव्हा तुम्ही माझ्यासमोर दोघांना अश्लील भाषेत किती शिव्या घातल्या होत्या. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना दोघांनाही शिव्या घातल्या होत्या. कदाचित तुम्ही हे विसरले असाल पण मी विसरलो नाही. आपल्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. आपण मुळात शिवसैनिकच नाहीत. ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. पण उसणं अवसान आणून जणू शिवसेना तुम्हीच वाचवत आहात, असा अविर्भाव दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आपण फसवत आहात,” असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.