नवी दिल्ली – श्रीरामाचे चरित्र आणि संपूर्ण रामायण हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. कोणीही त्याशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पनाच करु शकत नाही. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस, २२ जानेवारी २०२४ ही तारीख दहा हजार वर्षांहून अधिक काळ ऐतिहासिक दिवस राहील, हे नक्की, अशा शब्दांत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक घटनेबद्दल आपल्या भावना संसदेत व्यक्त केल्या.
विद्यमान सरकारच्या अखेरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शनिवारी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत ‘ऐतिहासिक श्री राम मंदिराचे बांधकाम आणि श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या विषयावरील चर्चा झाली. त्यावेळी शहा बोलत होते.
शहा पुढे म्हणाले की, १५२८ पासून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याच्या विजयाचा हा दिवस आहे. २२ जानेवारी २०२४ हा संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक चेतनेच्या नवजागरणाचा दिवस आहे. राम आणि रामाचे चरित्र हा भारतातील लोकांचा आत्मा आहे. संविधानाच्या पहिल्या प्रतीपासून महात्मा गांधींच्या आदर्श भारताच्या संकल्पनेपर्यंत रामाचे नाव वापरले जात राहिले. अनेक भाषा, संस्कृती आणि धर्मांमध्ये रामायणाचा उल्लेख आहे. अनेक देशांनी रामायण स्वीकारले आहे आणि ते एक आदर्श ग्रंथ म्हणून मांडले आहे. रामजन्मभूमीसाठी १८५८ पासून कायदेशीर लढाई सुरू होती. ३३० वर्षांनंतर आज कायदेशीर लढाई संपुष्टात आली आहे.
राम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नये, असा ठराव आम्ही पालमपूर कार्यकारिणीत संमत केला होता, याकडे लक्ष वेधून शहा पुढे म्हणाले की, देशाच्या चैतन्याचे पुनरुज्जीवन करण्याची ही चळवळ आहे. राम मंदिर बांधू, तिहेरी तलाक हटवू, समान नागरी कायदा आणू, कलम ३७० हटवू, असे आम्ही जाहीरनाम्यात म्हटले होते. तेव्हा मते मिळवण्यासाठी भाजप अशी आश्वासने देते, असे म्हटले गेले होते. पण आम्ही आमचा प्रत्येक शब्द खरा केला आहे.
शहा असेही म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाशी तुमचा संबंध आहे की नाही? तुम्ही निवाडा कसा टाळू शकता? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भारताचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य अधोरेखित झाले आहे. जगातील कोणत्याही देशात असे घडलेले नाही, जेव्हा बहुसंख्य समाजाने आपला विश्वास पूर्ण करण्यासाठी इतका संघर्ष केला आणि वाट पाहिली.
काॅंग्रेस सत्तेत असती तर मंदिर झाले नसते…
ओडिशाच्या बालासोरचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी लोकसभेत म्हणाले की, राम मंदिराचा विषय आमच्यासाठी भावनिकच होता. मी स्वत: कारसेवक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अशक्य काम पूर्ण केले आहे. जर काँग्रेस सत्तेत असती तर राम मंदिर कधीच बांधले गेले नसते, याची मी नक्कीच हमी देऊ शकतो.