आयोध्या प्रकरणी मुस्लिम पक्षकारांचे सलग दुसऱ्या दिवशी निवेदन सादर
नवी दिल्ली: रामाच्या मूर्त्या 22 आणि 23 डिसेंबर 1949 दरम्यानच्या रात्री आयोध्येतल्या बाबरी मशिदीच्या आत नेऊन ठेवणे हा एक नियोजनबद्ध कट होता. यासाठी काही अधिकाऱ्यांनी हिंदूंना सहाय्य केले आणि मूर्त्या हटवण्यास विरोध केला होता, असे आज मुस्लिम पक्षकारंच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले गेले.
राम जन्मभूमी – बाबरी मशिद वाद प्रकरणी 5 सदस्यीय घटनापिठासमोर सुरू असलेल्या दैनंदिन सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकारंच्यावतीने ऍड. राजीव धवन यांनी सलग दुसऱ्या दिवशी आपले निवेदन सादर केले. स्पष्ट सूचना मिळाल्यानंतरही फैजाबादचे तत्कालिन उपायुक्त के.के.नायर यांनी या मशिदीतील मुर्त्या हटवल्या नाहीत, असे ऍड. धवन यांनी न्यायालयात सांगितले.
मशिदीमध्ये मूर्त्या असणे हा काही चमत्कार नव्हता. हा एक नियोजनबद्ध कटाचा भाग होता, असे ऍड. धवन म्हणाले. मूर्त्या मशिदीमधून न हटवणारे नायर यांना वस्तुस्थिती माहिती होती. कालांतराने त्यांनी भारतीय जनसंघकडून लोकसभेची निवडणुकही लढवली होती, असे ऍड. धवन म्हणाले.
वादग्रस्त वास्तूच्या आतील फोटो नायर यांनीच हिंदूंना दाखवले आणि न्यायालयाच्या “जैसे थे’स्थितीबाबतच्या आदेशाचे उल्लंघनही केले होते. हेच फोटो पुढे हिंदूंकडून वास्तू म्हणजे मंदिर असल्याचा दावा करण्यासाठी वापरले गेल्याचा आरोपही ऍड. धवन यांनी केला.