Ram Kadam : देशभरात एकीकडे 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचे जल्लोषाचे वातावरण असताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात प्रभू श्रीराम शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान,जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, घाटकोपरमध्ये भाजपचे आंदोलनही सुरू आहेत. याशिवाय मुंबई, पुणे आणि नाशकातही आंदोलन सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अशातच भाजप आमदार राम कदम आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.
“श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, राम भक्तांची माफी मागावी, भव्यदिव्य राममंदिर बनतंय यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, “असे राम कदम यांनी म्हटले आहे. तसेच, जितेंद्र आव्हाडांना अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी,” राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, “आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.