Jitendra Awhad – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, तो 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य आव्हाड यांनी शिर्डीमध्ये केले यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. अशात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर ठाकरे गटाची कोंडी होणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, या चर्चांवर प्रतिक्रिया देतांना आज ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाला सुनावले आहे.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे
‘आमची कोंडी होत नाही. ते जितेंद्र आव्हाडांचे विधान आहे ते त्यांच्यापाशी असेल. आम्ही या विधानाचे समर्थन करत नाही. रस्त्यावर उतरण्याची काही गरज आहे असं वाटत नाही. पण या विधानाचा निषेध करतो. प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे’ असं त्यांनी म्हटलं.