श्रीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापाठोपाठ जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही पाकिस्तानवर निशाणा साधला. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात. अन्यथा, भारतीय लष्कर आतपर्यंत घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त करेल, असे मलिक यांनी म्हटले.
पाकिस्तानने दहशतवादी तळ बंद करावेत. पाकिस्तानची वर्तणूक सुधारली नाही तर भारत आणखी कडक कारवाई करेल, असा इशारा मलिक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय 5 ऑगस्टला घेण्यात आला. त्या निर्णयानुसार त्या राज्याचे विभाजन होऊन 31 ऑक्टोबरपासून दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहेत.
मात्र, त्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संदर्भ देऊन मलिक म्हणाले, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांना काय मिळाले? 1 नोव्हेंबरपासून नवा काश्मीर उदयास येईल. त्याच्या विकासासाठी सर्वांनीच योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.