नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. पीएम म्हणाले, आमच्या योजनांच्या नावावर प्रश्न उपस्थित केले जातात, काही योजनांच्या नावांमध्ये संस्कृत शब्द वापरल्याबद्दलही त्यांचा आक्षेप आहे. कोणत्याही कार्यक्रमात नेहरूजींचे नाव घेतले नाही तर काँग्रेसच्या लोकांचे रक्त तापते. हा देश कोणत्याही कुटुंबाची जहागीरी नाही, पिढ्यानपिढ्या माणसांनी बनलेला हा देश आहे. आम्ही मेजर ध्यानचंद यांच्या नावावर राजीव गांधी खेलरत्नचे नाव ठेवले, आम्हाला अभिमान आहे, असे मोदी म्हणाले.
पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘मी कुठेतरी वाचले आहे, मी त्याची पुष्टी करत नाही, परंतु आजही देशातील 600 हून अधिक योजना गांधी आणि नेहरू कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत. तुम्ही आम्हाला प्रश्न करता, पण नेहरू आडनाव स्वतः ठेवायला लाज वाटते का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 मुद्दे –
1) पंतप्रधानांनी टोला मारत म्हटले की, काल मल्लिकार्जुन खरगे तक्रार करत होते की मोदीजी वारंवार माझ्या मतदारसंघात येतात, मी त्यांना सांगू इच्छितो की, मी आलो म्हणून तक्रार करण्यापूर्वी हे पाहा की मी येण्यापूर्वी किमान एक कोटी 70 लाख बँक खाती उघडली होती, त्यापैकी 8 लाखांहून अधिक जनधन खाती उघडली होती. आता तिथे जनतेने काँग्रेसचे खातेच बंद केले तर मी काय करू.
2) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले, ‘ते ‘गरीबी हटाओ’ म्हणायचे, पण 4 दशकांहून अधिक काळ काहीही केले नाही. देशातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत.
3) राज्यसभेत गदारोळ आणि घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरडपट्टी काढली. छाती ठोकून ते म्हणाले की, आज देश पाहत आहे की एक व्यक्ती अनेकांवर भारी पडत आहे. मी देशासाठी जगतो, देशासाठी काहीतरी करण्यासाठी बाहेर पडलो आहे.
4) सैन्यात मुलींच्या वाढत्या सहभागावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भारत मातेच्या रक्षणासाठी माझ्या देशाची मुलगी सियाचीनमध्ये तैनात होते तेव्हा मला अभिमान वाटतो. आज देशात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढत आहे.
5) विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जेवढी चिखलफेक कराल, तेवढे कमळ फुलेल.’ सभागृहात असेही लोक बसलेले आहेत, ज्यांनी आपल्या जीवनात अनेक सिद्धता प्राप्त केल्या आहेत. सभागृहात जे घडते ते देश गांभीर्याने ऐकतो.
6) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘हा देश कोणत्याही कुटुंबाची जाहागीरी नाही. पिढ्यानपिढ्या माणसांनी बनलेला हा देश आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावावर आम्ही खेलरत्न नाव दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच आम्ही 21 बेटांना परमवीर चक्र मिळालेल्या वीरांचे ठेवले आहे.
7) पीएम मोदी म्हणाले की, युनिकॉर्नच्या जगात आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आज भारत डिजिटल जगात जगाचा नेता बनला आहे. एक काळ होता जेव्हा आपण मोबाईल आयात करायचो, आज माझा देश मोबाईल निर्यात करतो आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाचा देश अतिशय वेगाने अवलंब करत आहे.
8) पंतप्रधान म्हणाले की, माझ्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनासाठी अशी लस बनवली जी जगभरात स्वीकारली गेली आणि 150 देशांना त्याचा फायदा झाला.
9) पीएम मोदी म्हणाले की, विश्वास ही मोठी शक्ती आहे, आम्ही लोकांचा विश्वास जिंकला आहे. कष्ट करावे लागले पण दुर्गम गावांना आशेचा किरण दिसला. पूर्वीच्या सरकारांमध्ये वीज काही तासांसाठी यायची. आज 22 तास वीज देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
10) पीएम मोदी म्हणाले की, आम्ही तंत्रज्ञानाच्या बळावर कार्यसंस्कृती बदलली आहे. वेग वाढवण्यावर आणि स्केल वाढवण्यावर आमचा भर आहे.