मुंबई- बाजार समित्या बरखास्त करण्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. बाजार समित्या बरखास्त करण्याची गरज आहे? अर्थमंत्र्यांचे हे अर्थहीन वक्तव्य आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना अदानी, अंबानी आणि वॉलमार्टचे गुलाम बनवता काय?, असा सवाल राजू शेट्टी यांनी ट्वीट करत केला आहे. राज्यांनी एपीएमसी म्हणजेच कृषी बाजार समित्या बंद करुन ई-नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल केले होते. यावर शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त करत विरोध केला आहे.
ई-नाम ही ऑनलाईन व्यवहार पद्धती मोदी सरकारने एप्रिल महिन्यात आणली आहे. कृषी मालाला चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी राज्यांनी एपीएमसी बंद करुन ई-नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन निर्मला सीतारमण यांनी केले. काल राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. यानंतर या वक्तव्याचा विरोध शेतकरी संघटना आणि नेत्यांनी केला आहे.