मुंबई- निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने काही दिवसांपासून हॉटेल रिट्रिटमध्ये मुक्कामी असलेले शिवसेनेचे आमदार स्वगृही परतले आहेत. आमदार एकनाथ शिंदे आणि आमदार रामदास कदम यांनी सर्व आमदारांना आपआपल्या मतदार संघात जाण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व आमदार परतले.
राज्यात सत्तास्थापनेबाबतचे राजकीय नाट्य अजून सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केल्यामुळे भाजप-सेनेत बिनसले असून सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार होऊ शकतो. यामुळे शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व आमदारांना आधी रंगशारदा आणि त्यानंतर हॉटेल रिट्रिटमध्ये ठेवले होते.
सध्या महाशिवआघाडीची सत्तास्थापनेच्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याने या सर्व आमदारांना घरी जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात सध्या ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. प्रत्येक आमदाराला मतदारसंघाचा आढावा घेता यावा यासाठी मतदार संघात जाण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेच्या सुनील राऊत यांनी दिली.
दरम्यान, राज्यपालांसमोर सर्व आमदार उपस्थित राहण्यासाठी सर्वांना एकत्र ठेवले होते. सध्या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. सत्तास्थापनेचं ज्या दिवशी ठरेल त्यादिवशी सर्वांना पुन्हा बोलावण्यात येईल. उद्धव ठाकरे ओला दुष्काळ असणाऱ्या भागाचा दौरा करणार आहेत. मध्यवर्ती निवडणुकांची केवळ चर्चा आहे, असे काही होणार नाही.
अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याबाबत अमित शहा वारंवार बोलत आहेत. त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले आहे. दरम्यान, 17 नोव्हेंबरला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला सर्वजणांना हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.