जयपूर – राजस्थानात सत्ताबदल झाला आहे. आता सुशासन आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात जनतेशी निगडीत असलेली एकही योजना बंद केली जाणार नाही तर उलट जनतेच्या हिताच्या असलेल्या योजनांचा विस्तार केला जाईल अशी घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केली आहे.
सरकार भाजपने दिलेल्या घोषणापत्रातील सगळी आश्वासने पूर्ण करेल तसेच पहिल्या शंभर दिवसांत पूर्ण करण्याच्या योजनांवर काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानात सबका साथ, सबका विकास या न्यायाने काम केले जाईल.
तसेच पूर्वीच्या गेहलोत सरकारची मोफत औषधांची योजना सुरूच ठेवली जाईल. किंबहुना गंभीर आजारांची औषधेही या योजनेखाली गरिबांना मोफत उपलब्ध करून दिली जातील असे शर्मा यांनी सांगितले.
राज्यात महिलांवर अत्याचार होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सक्त सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात शून्य सहिष्णुता या धोरणानुसार काम केले जाईल आणि भ्रष्टाचाऱ्यांची अथवा त्यांची शिफारस करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.