मुंबई : गेल्या पाच वर्षात चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुंबईत पूल पडून त्याखाली चिरडून माणसे मेली. पण त्याने कोणालाही काही फरक पडला नाही. पाच वर्षात तुम्ही काय केले हे विचारणार कोण असा सवाल करत प्रबळ विरोधी पक्षाची गरज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधोरेखित केली.
भांडुप येथे झालेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. निवडणुकांच्या काळात अनेक हुजरे मुजरे करायला येतात. निवडणूक झाली कि तुमचा विसर पडतो. आपण सत्तेवर येताना काय आश्वासने दिली होती याचा विसर पडतो. त्याचा जाब विचारायला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. असे ते म्हणाले.
राज्याच्या ग्रामीण भागात शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे. त्याची कुणालाही पर्वा नाही. भाजपा आणि शिवसेना यांनी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. मात्र याचा तुम्हाला सोयीस्कर विसर पडला आहे, असे ते म्हणाले.