शरद पवार : ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ उरुळी कांचन येथे घेतली सभा
उरुळी कांचन- मोदी सरकारने कलम 370 प्रमाणेच कलम 371 रद्द करुन दाखवावे. त्यालाही आम्ही पाठींबा देऊ, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ उरुळी कांचन (ता. हवेली) येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के,अशोक काळभोर, माधव काळभोर, रवींद्र काळे, दिलीप वाल्हेकर व शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, मोदी सरकारने रद्द केलेल्या कलम 370 ला आमचाही पाठिंबा होता. फक्त काश्मीर मधील जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, अशी आमची मागणी होती. मात्र, मोदी सरकारला कलम 370 वरुन राजकारण करायचे होते. त्यामुळे त्यांनी सर्वच पक्षांना राष्ट्रदोही ठरवले. आणि देश पातळीवर घाणेरडे राजकारण केले. रद्द केलेल्या कलम 370 नुसार हिंदुस्थानातील कोणत्याही राज्यातली व्यक्ती काश्मीरमध्ये जमीन खरेदी करु शकते; मात्र अशाच प्रकारचे कलम 371 हे ईशान्येकडील राज्यांसंदर्भात आहे. तेथील कलम 371 मोदी सरकारने रद्द करुन दाखवावे, असे आवाहन शरद पवार यांनी मोदी सरकारला केले.
सध्याचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांचे काहीही घेणे-देणे नाही. या सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने एकही निर्णय घेतलेला नाही. सहकार मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे लोकांच्या हिताचे राज्य घडवण्यासाठी ही विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचे पवारांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, जेष्ठ नेते के. डी. कांचन, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवीदास भन्साळी, देवीदास कांचन यांची भाषणे झाली.
- लष्काराचे श्रेय मोदी सरकार विनाकारण घेतात
सर्वपक्षीय बैठकीत हिंदुस्थानने पुलवामा दहशतवादी तळावर हल्ला करावा, असा सल्ला मीच मोदी सरकारला दिला होता. त्यानुसार हिंदुस्थानच्या हवाई दलाने कारवाई करुन पुलवामा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. हे आम्ही कधी सांगितले नाही. मात्र, जे काम आपले लष्कर करते त्याचे श्रेय मोदी सरकार विनाकारण घेत आहे. - कंद यांच्याबाबतीत आमची चूक झाली
दिवंगत विद्याधर कंद आणि माझे खूप घनिष्ठ संबंध होते. आम्ही दोघांनी एकमेकांना खूप मदत केली. त्यामुळेच पुढे प्रदीप कंद यांना मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष केले. ते करायला नको होते. प्रदीप कंद यांना खालच्या पातळीपासून काम करायला लावले पाहिजे होते. आमची चूक झाली, असे शरद पवार यांनी यावेळी पक्षांतर केलेल्या प्रदीप कंद यांच्याबाबत सांगितले. - सरकारने साखर कारखानदारी अडचणीत आणली आहे. सरकार फक्त विकासाच्या गप्पा मारत आहे. प्रत्यक्ष विकास कोठेही झालेला नाही.
– ऍड. अशोक पवार, माजी आमदार