मुंबई – राज्यात सध्या दोन समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. दोन समाजात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावबाबत आता मनसेमध्ये देखील चर्चा झाल्याचे समजते. यावेळी आरक्षणाच्या (Reservation) वादात न पडण्याचा सल्ला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यात राज ठाकरे यांनी देखील मनोज जरांगे त्यांची भेट घेतली होती. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आरक्षण कधीच मिळणार नाही हे स्वतः राज ठाकरे यांनी जरांगे यांना स्पष्ट सांगितले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी (Shivtirth) बैठक घेतली. आरक्षणाच्या वादात पक्षाच्या नेत्यांनी पडू नये अशी सूचना राज ठाकरेंनी सर्वांना दिली.
आजच्या बैठकीत 25 नोव्हेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाने मराठी पाट्यांसाठी (Marathi board) दुकानदारांना मुदत दिली आहे. ज्या दुकानदारांनी अद्याप पाट्या बदलल्या नसतील अशांना आठवण करून द्या, असे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
“आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) प्रत्येक मतदारसंघाता वॉर रूम उभारणार आहोत. नेत्यांना त्याच्या जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत. लोकसभाचे उमेदवार कोण असले पाहिजे, काय असले पाहिजे? या संदर्भात चर्चा झाली,’ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.