मुंबई – ब्रिटनच्या सर्वाधिक काळ सिंहासनावर राहिलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. ब्रिटीशशाही परंपरेनुसार, राणीच्या मृत्यूनंतर, तिचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स याला ब्रिटनचा राजा घोषित करण्यात आले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या पोस्टमधून राणी एलिझाबेथ यांच्या जीवनपटावर संक्षेपात प्रकाश टाकला आहे. तसेच, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी, त्यांनी लीलया पेललेली आव्हाने, फक्त ब्रिटनच नव्हे, तर जगाच्या इतिहासात त्यांचं असलेलं महत्त्व, राजघराण्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असताना त्यांनी दाखवलेला संयम अशा अनेक मुद्द्यांना राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये हात घातला आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे.
ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.