Raj Thackeray : महाराष्ट्रातील राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली आहे. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
राज ठाकरे यांच्या ‘शिवतिर्था’ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे विविध चर्चा रंगल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर जाऊन आले होते आणि आज राज ठाकरे व आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली.
काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाली आहे. मुंबईसारख्या भागात लोकसभेमध्ये मनसेची मदत भारतीय जनता पक्ष घेणार अशी चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्याच अनुषंगाने आजची शेलार व राज ठाकरे यांची भेट झाली असावी असा अंदाज लावला जात आहे. निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी भाजपची तयारी सुरू असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र याबाबत थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषदेत माहिती देण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया
मनसे- भाजप युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती. “आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल. आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होत असतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारतो. ते बऱ्याचदा काही चांगल्या सूचना करतात. कधीकधी आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. ही गोष्ट लवकरच आपल्याला समजेल. अद्याप कोणीही त्यावर निर्णय घेतलेला नाही,” असे फडणवीस म्हणाले होते.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना देखील माध्यमांनी असाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी इथे भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्न नाही, कोणीही कोणालाही भेटलं की युत्या होत नसतात. मागे एकदा बाळासाहेबांचं (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे) पुस्तक प्रकाशित केलं तेव्हा मंचावर शरद पवार उपस्थित होते, म्हणजे लगेच आमची युती झाली का? तो तुम्हा प्रसारमाध्यमांच्या रोजच्या बुलेटिनचा भाग असेल, त्याचा आमच्याशी संबंध नसतो.