मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा म्हटले आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचा आमचा निर्धार कायम आहे.
राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादच्या सभेतील नियम भंगाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांच्या संबंधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. राज्यभरात सुमारे 250 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. आज या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ठाम असल्याचे प्रतिपादन केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्या माहितीनुसार, मुंबईत 1,140 हून अधिक मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून पहाटे 5 वाजता अजान वाजवली. आम्हाला राज्यात शांतता हवी आहे. मला पोलिसांना विचारायचे आहे की तुम्ही फक्त आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहात. माझा मुद्दा असा आहे की सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर मशिदींमधून काढून टाकण्यात यावेत, जोपर्यंत ते हटवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू, असे ते म्हणाले.
सरकार आपल्या आदेशाचे पालन करत नसेल तर सर्वोच्च न्यायालय काय करते हे मला पहावे लागेल,असे ते म्हणाले. 12 एप्रिल रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिल्याने अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात राज्यभर सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले असून पोलिसांनीही अनेक ठिकाणी कडक भूमिका घेतली आहे.