मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आयोध्येला जाण्याची घोषणा केल्यापासून राजकारण तापलं आहे. त्यातच राज यांना भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कडाडून विरोध करत इशारा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. आता यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे हिंदू आहेत. त्यांना आयोध्येला जाण्याचा अधिकार आहेच. त्यांनी आवश्य आयोध्येला जावं. मात्र त्यांच्याविषयी उत्तर भारतीयांच्या मनात आढी आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागून आयोध्येला जावं.
भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीवर रामदास आठवले यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, मनसेसोबत युती केल्याने भाजपला फारसा फायदा होणार नाही. भाजप आपल्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे भाजप-मनसे युती व्हायला नको, असंही आठवले यांनी नमूद केलं.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत काही दिवसांपूर्वीच आयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतर भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा आयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण यांनी दिला आहे. त्यावरूनच आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं.